Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Wednesday, July 15, 2026

कवी कालिदास : चिरंतन साहित्याप्रवाह

 


"आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥"

आषाढाचा पहिला दिवस. नभात काळेभोर मेघ दाटून आले आहेत. डोंगर-शिखरांना बिलगून बसलेले ते मेघ जणू एखाद्या खेळकर हत्तीने पर्वताला कवेत घेतल्याचा भास निर्माण करतात. विरहाने व्याकूळ झालेला यक्ष त्या मेघाकडे पाहतो आणि त्याच्या मनात आशेची एक नवी पालवी फुटते. तो त्या मेघालाच आपल्या प्रेयसीचा दूत बनवतो. केवळ दोन ओळी... पण डोळ्यांसमोर उभं राहतं एक जिवंत चित्र!

हीच महाकवी कालिदासांची जादू. ते फक्त निसर्गाचं वर्णन करत नाहीत, तर ते निसर्गाला बोलतं करतात. ते फक्त उपमा देत नाहीत, तर उपमांनाच अमरत्व देतात. त्यांच्या शब्दांतून ऋतू जिवंत होतात, पर्वत श्वास घेतात, नद्या गातात आणि मेघही दूत बनतात. म्हणूनच संस्कृत साहित्यातील प्रत्येक रसिकाच्या मनात कालिदासांचं स्थान आजही अढळ आहे.

याच कारणामुळे आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस केवळ पावसाच्या आगमनाचा नाही; तर तो भारतीय साहित्यविश्वातील या अमर प्रतिभेला अभिवादन करण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो.

कालिदासांच्या जीवनाची कथा म्हणजे अंधाराकडून तेजाकडे झालेला प्रवास. त्यांच्या जन्मकाळाबद्दल इतिहासकारांची वेगवेगळी मतं असली, तरी त्यांच्या प्रतिभेच्या तेजावर कोणाचाही मतभेद नाही. आख्यायिकेनुसार, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यामुळे एका गवळ्याने त्यांचं पालनपोषण केलं. शिक्षणाची संधी न मिळाल्याने ते अशिक्षित राहिले. समाज त्यांच्याकडे बुद्धिहीन तरुण म्हणून पाहत होता. पण कधी कधी नियती आपल्या महान कलाकृतीची सुरुवात अगदी साध्या रेषेपासून करते. कालिदासांचं आयुष्यही असंच घडत गेलं.

कालिदासांचं साहित्य वाचताना जाणवतं की, ते केवळ कवी नव्हते; ते मानवी भावनांचे सूक्ष्म निरीक्षक होते. प्रेम, विरह, आनंद, करुणा, आशा, ऋतूंचे बदल, निसर्गाची लय या सगळ्यांना त्यांनी शब्दांत असं गुंफलं की, प्रत्येक वाचकाला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्यांच्या लेखनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे चित्रमयता. वाचकाला एखादा श्लोक वाचताना तो केवळ वाचल्यासारखा नाही, तर अनुभवल्यासारखा वाटतो.

त्यांच्या उपमा इतक्या प्रभावी आहेत की, संस्कृत साहित्यात आजही एक म्हण प्रचलित आहे, "उपमा कालिदासस्य", म्हणजेच उपमेचा विषय निघाला की, कालिदासांचीच आठवण होते.

त्यांच्या लेखणीतून हिमालय हा केवळ पर्वत राहत नाही; तर तो पृथ्वीचा मुकुट बनतो. मेघ हा फक्त पावसाळी ढग राहत नाही; तर विरही हृदयाचा सखा बनतो. शकुंतला ही केवळ नायिका राहत नाही; तर निरागस प्रेमाचं प्रतीक बनते. यामुळेच त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.

अभिज्ञानशाकुन्तलम् या नाटकाने युरोपातील विद्वानांनाही मंत्रमुग्ध केलं. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आणि जगभरातील साहित्यप्रेमींनी कालिदासांच्या प्रतिभेला वंदन केलं.

आजही कालिदासांचं साहित्य वाचताना आश्चर्य वाटतं. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आजही इतके ताजे कसे वाटतात? याचं उत्तर त्यांच्या शैलीत दडलेलं आहे. त्यांनी निसर्गाला मानवी भावना दिल्या आणि मानवी भावनांना निसर्गाचं सौंदर्य. त्यामुळे त्यांच्या कविता केवळ वाचल्या जात नाहीत, तर त्या जगल्या जातात. म्हणूनच त्यांना 'उपमा सम्राट', 'कविकुलगुरू' अशा उपाधींनी गौरवण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश शासनाचा 'कालिदास सन्मान' हा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आजही दिला जातो.

आषाढातील पहिला मेघ जेव्हा आकाशात दाटून येतो, तेव्हा तो फक्त पावसाची चाहूल देत नाही; तर तो आपल्याला आठवण करून देतो त्या कवीची, ज्याने मेघालाच दूत बनवलं, ऋतूंना कविता बनवलं आणि शब्दांना चिरंतन सौंदर्य बहाल केलं. महाकवी कालिदास, ज्यांनी संस्कृत साहित्याला केवळ समृद्ध केलं नाही, तर वाचकांना जगाकडे पाहण्याची एक नवी, अधिक सुंदर दृष्टी दिली.

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि कालिदास दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


- वेदिका काण्णव 

Friday, November 14, 2025

लहानपण देगा देवा...


निखळ हास्याने भरलेलं, निरागस आनंदाने फुललेलं, कुठल्याही मुखवट्याशिवाय आत बाहेर अगदी खरं खरं असणारं बालपण! लहान मुले म्हणजे अगदी कोरी पाटी, आयुष्याचा प्रत्येक धडा स्वतःवर कोरून घेण्यास सज्ज असणारे, अगदी मोकळे, बिनधास्त!  

"लहानपण चांगलं होतं" असं एक वाक्य प्रत्येकाने प्रत्येकाच्या तोंडून एकदा तरी ऐकलंच असेल. साहजिक आहे, लहानपणी जे बिनधास्त, निरागस आयुष्य आपण जगलो, ते मोठेपणी हरवलं जातं. आठवतंय का, आपण नक्की केव्हा मोठे झालो ते? आईचे बोट धरून चालायला लागलो तेव्हा, की ते बोट सोडून एकटे पळायला लागलो तेव्हा? मनातलं बोलायला शिकलो तेव्हा की बोलणं मनात ठेवायला शिकलो तेव्हा? पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा, की शेवटचं शाळेत गेलो तेव्हा? पुस्तकं वाचायला शिकलो तेव्हा, की माणसं वाचायला शिकलो तेव्हा? लढायला शिकलो तेव्हा की हरायला शिकलो तेव्हा? नक्की आपण "मोठे" झालो कधी? "नक्की" आपण मोठे झालो आहोत का? 

मी तर म्हणेन, आपण मोठे झालेलोच नाही! ते तर समाजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून वयाची कारणं देऊन थोपवलेली कर्तव्ये आपल्या आयुष्याला विभाजतात, परंतु वैयक्तिक पातळीवर, आपल्या नजरेत आपण असा क्षण नाहीच शोधू शकत जेव्हा आपण मोठे झालो असं ठामपणे सांगू शकू. खरंतर माणूस कधीच मोठा होत नाही, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो वाढत असतो, घडत असतो, चुकत असतो, शिकत असतो, तो लहानच असतो, कायम...त्यामुळे हे 'लहानपण चांगलं होतं' हे वाक्य बदलून, 'लहानपण चांगलं आहे' असं म्हणावं लागेल, आणि याचाच अर्थ होतो की सारं जीवनच चांगलं आहे, फक्त त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, आणि ही कला आपल्या सगळ्यांना देवाने जन्मतःच भेट दिलेली असते, फक्त वापरायला विसरून जातो आपण, एवढंच! खरंतर ज्या लहानपणाला हा समाज चांगलं चांगलं म्हणत स्वतः दुःखी होत असतो, ते लहानपण आपल्याला साधं लक्षात सुद्धा राहत नाही, किंबहुना लक्षात राहत नाही, म्हणूनच हा समाज त्याला चांगलं म्हणत असावा! नाहीतर तेव्हाच्या आवडतं खेळणं तुटण्याच्या दुःखाची तुलना आजच्या नोकरी गमावण्याच्या दुःखाशी होऊच शकत नाही... दुःखे आयुष्याच्या कोणत्याच टप्प्यात टळत नाहीत, विषय आपण त्यांना किती महत्त्व देतो याचा आहे!

त्याकाळी आपण त्या ईश्वरनिर्मित सृष्टीत जगत होतो, आज आपण स्वयंनिर्मित सृष्टीत जगतो. आपल्या आजुबाजूला केवळ आपल्या विचारांचे, अपेक्षांचे, अनुभवांचे जाळे आहे, ईश्वर निर्मित सृष्टी त्या पलीकडे आहे, जी या जाळ्यामध्ये गुंतून विचित्र, क्लिष्ट वाटायला लागली आहे. असं म्हणतात, लहान मुलं एखादी गोष्ट नुसती बघून शिकतात. खरं तर ते बघून शिकतात, कारण ते मुळात "बघतात". आपण मात्र हरवलेले असतो, आपल्याच विश्वात, इतरांकडे बघायला वेळ असतो कुठे आपल्याकडे? आणि चुकून बघितलं, तरी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहेच शिक्षणात आडकाठी घालायला. थोडक्यात काय, तर लहानपण म्हणजे काही वय नाही, तो जगण्याचा दृष्टिकोन आहे, लहान मुलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं तर जग मोठं, उदात्त, सुंदर आणि अथांग भासेल! लहानपणी आपल्याला मोठे होण्याची हौस असते, मोठे झालो की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. पण खरंतर लहान किंवा मोठ्यांसारखं आयुष्य जगायला वय बदलायची तितकीशी गरज नाही. आपण ना वय बदलू शकतो, ना हे जग. त्यापेक्षा दृष्टिकोन बदलूया, जग आपोआप बदलेल, सुंदर दिसेल!

मनाची दारं आनंदासाठी, दुःखासाठी, यशासाठी आणि अपयशासाठीसुद्धा सताड उघडी ठेवावीत. लहान मुलं स्वतःहून कशाला घाबरत नाहीत, मोठे लोकच त्यांच्या मनात भीती भरतात. तसंच हे "मोठे लोक" स्वतःच्या मनात सुद्धा भीती भरत असतात, आणि घाबरून जातात. वेदनांवर लक्ष दिलं की त्यांची तीव्रता वाढते, आणि दुर्लक्ष केलं की वेदना कमी होते. शारीरिक दुखण्यात जर मानसिक बळ एवढं उपयोगी पडत असेल, तर साहजिक आहे मानसिक दुखणे ते सहज पळवून लावू शकेल, फक्त इच्छा पाहिजे.

थोडक्यात, आपल्या मोठ्यापणीच्या या जगण्यात लहानांचा मनमोकळा दृष्टिकोन अंगीकृत करूया आणि दिलखुलास जगूया, शिकूया आणि आयुष्यभर असेच लहानच राहूया!

बालदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!


-प्रांजल काटकर

Thursday, August 28, 2025

दृष्टी

 

कविता ही अशी देणगी आहे जी कधी कधी काही प्रसंगांना सहजच शब्दबध्द करून जाते, तशीच ही माझी कविता! आपण कधीकधी आपल्या दुःखांना मोठं समजतो पण कधी असं झालंय तुमच्यासोबत की कुणीतरी नकळत तुम्हाला हसत हसत संकटांना सामोरं जायला शिकवून गेलंय ? माझ्यासोबत एकदा असं झालं आणि त्या प्रसंगाने मला जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याची एक नवीन 'दृष्टी' दिली.


ते स्तब्ध होते; माझ्या मनात मात्र विचारांचे वादळ होते.

त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि निरागसतेचा संगम;

माझ्या मनात मात्र कोलाहल, प्रश्न, संभ्रम होते.

माझ्याकडे सगळं असूनही मी अतृप्त होतो;

त्यांच्याकडल्या उणीवाही त्यांना जगण्याचं बळ देत होत्या.

मला चिंता होती भविष्यातल्या 'जर-तर'ची;

ते वर्तमानातील चिंतांशीही मैत्री करून जगत होते.

ते एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते;

मी तर हेव्यादाव्यांच्या जगात कधीच एकटा पडलो होतो.

ते एक एक पाऊल सावकाश टाकत होते,

आणि मी पुढे जायच्या घाईत काही पाऊलं कधीच गाळली होती.

ते जात होते पुढे चाचपडत, पण योग्य दिशेने;

मात्र मी निवडलेली दिशा योग्य आहे का नाही, हे कधी पडताळून पाहिले नव्हते.

त्यांच्या चेहऱ्यावर आशावाद स्पष्ट दिसत होता;

त्यांच्याकडे उमेद होती,

मी मात्र उसनं अवसान आणून, एकेक दिवस पुढे ढकलत होतो.

त्यांच्यातल्या कमींसाठी ते कधी मागत नव्हते सहानुभूती;

ना देवाला दोष, ना ग्रह-ताऱ्यांची भिती त्यांना होती.

त्यांना बघून जणू माझं भावविश्वच ढवळून निघालं;

विचारांचा वेग वाढला,

आणि मी स्वतःलाच कोड्यात पाडलं.

तेव्हा कळून आलं — माझ्याकडे नजर होती,

पण त्यांच्याकडे दृष्टी होती.

ते दृष्टीहीन नव्हतेच; मुळी मीच स्वार्थांध होतो.

ते जगण्यासाठी धडपडत होते,

मी धडपडत जगत होतो.

तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला;

गाडी सुसाट सुटली,

आणि या अल्पशा वेळात जणू जीवनाची नवी वाट गवसली.


नेहमीप्रमाणे मी कॉलेजला जाण्यासाठी बसने प्रवास करत होते. एका लाल सिग्नलवर थांबले असताना खिडकीतून बाहेर पाहताना मला असे काही दिसले की त्या पाच मिनिटांतच आयुष्याचा एक मोठा धडा शिकायला मिळाला. त्या अनुभवातून उमटलेली ही कविता — माझ्या भावविश्वाचा तो दृष्टांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. ही कविता तुम्हालाही माझ्यासारखंच जीवनाचं बळ देऊन जावो!

-मनाली देशपांडे

Thursday, July 24, 2025

इतिहासाचे साक्षीदार ते जागतिक वारसा...

 


"शिवरायांचे आठवावे रूप l शिवरायांचा आठवावा प्रताप l 

शिवरायांचा आठवावा साक्षेप l भूमंडळी ll"

समर्थांच्या या ओळी सार्थ करणारी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याकडे घडली. युनेस्को (UNESCO) म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. या संघटनेने 'मराठा लष्करी लँडस्केप' (Maratha Military Landscapes) या नावाने महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांची निवड जागतिक वारसा स्थळांच्या यादी मध्ये केली. ही यादी ४७ व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला असा 'शिवनेरी', महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला 'तोरणा', महाराजांची पहिली राजधानी 'राजगड', ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला असा 'रायगड', अफजलखानाच्या वधाची ऐतिहासिक घटना घडली तो 'प्रतापगड', सिद्धी जौहर सोबत ऐतिहासिक झुंज दिली तो 'पन्हाळा', जिथे मुघलांविरुद्ध भयंकर युद्ध झाले असा 'साल्हेर', भक्कम तटबंदी आणि नैसर्गिक सौंदर्य असलेला आणि पोलादासम मजबूत असलेला 'लोहगड', सागरी संरक्षणासाठी महत्त्वाचा किल्ला म्हणजे 'विजयदुर्ग', समुद्रात बांधलेला अभेद्य किल्ला 'सिंधुदुर्ग', अरबी समुद्रातील 'सुवर्णदुर्ग', आणि शिवाजी महाराजांचे दक्षिणेतील लष्करी ठाणे म्हणजे 'जिंजीचा किल्ला'. प्रत्येक गड आणि त्या प्रत्येकाचं असलेलं विशेष महत्व... 

आज अभिमानाने उर भरून येतो की, भारतासारख्या देशात आम्ही राहतो— जेथील संस्कृती, सनातन वैदिक संस्कृती आहे. इथल्या केवळ वस्तू आणि व्यक्तीच नाही तर येथील मातीच्या कणाकणाला देखील ऐतिहासिक, आणि सांस्कृतिक महत्व आहे. 

पण आज आमचं दुर्दैव असं, की त्याची किंमत कळायला मात्र आम्हाला वेळ लागतोय! परदेशी व्यक्ती तिकीट काढून, लांब पल्ल्याचा प्रवास करून आमच्या गडकिल्यांचा अभ्यास करायला येतात; पण आम्ही भारतीय मात्र अनेकदा आमच्या गडकिल्ल्यांकडे केवळ भ्रमंती करण्याचे एक क्षेत्र म्हणून बघतो. किल्यांच्या भिंतीवर नाव कोरण्यात आम्हाला आमचं यश वाटतं. आणि यामुळे आम्ही त्या गडाच्या सौंदर्याला धक्का लावतो. 

खरंतर आपले गडकिल्ले हे आपल्यासाठी पवित्र मंदिरांप्रमाणे आहेत. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत केवळ 'स्वराज्य' हाच मंत्र जपलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या कार्यामध्ये वेळोवेळी त्यांना साथ देणारे— स्वराज्यासाठी लढलेले, झटलेले, झगडलेले, स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले सर्व हरहुन्नरी मावळे, आज या प्रत्येकाच्या स्मृती गडाच्या कणाकणांत आहेत. आज त्यांचं रक्त गडाच्या मातीत मिसळलं म्हणून स्वराज्य टिकलं! आणि अशा या आपल्या पवित्र गडकिल्ल्यांवर चढवलेला 'मानाचा मुकुट' म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या किल्ल्यांना दिलेला बहुमान आहे. ह्या ऐतिहासिक घटनेचे आपण सर्व साक्षीदार आहोत हे आपले भाग्य! जे गडकिल्ले आज या सर्वाची साक्ष देतात, त्यांना इथून पुढे प्राणपणाने जपणे हेच आपले कर्तव्य! तेव्हाच खऱ्या अर्थाने आणि अभिमानाने आपण सांगू की, "होय! जेथील 12 किल्ल्यांचा समावे्श आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आहे, ते किल्ले आमच्या मराठी माणसांची— आमच्या इतिहासाची ओळख आहेत....!!

- पूर्वा काणे

Tuesday, April 15, 2025

जगणं, जपणं आणि जिणं-कला

मानवाला खरं तर जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि प्राणवायू एवढ्याच गोष्टी पुरेशा होत्या; पण तरीही प्राचीन गुहाचित्रांचे अवशेष आणि शिल्पकलेचे नमुने आजही सापडतात. म्हणजेच प्राचीन काळात ‘कला’ ही विरंगुळा होती. मानवाच्या उत्क्रांतीसोबत कलेचं महत्त्व वाढत गेलं. मनातील गुंतागुंतीच्या आणि उत्कट भावनांना दिलेलं मूर्त स्वरूप म्हणजे ‘कला’. ही कला त्याच्या जगण्याला अर्थ देऊ लागली, आणि पुढे ती त्याच्या अर्थार्जनाचं साधनदेखील बनली. पण इतक्या बदलांनंतरही कलेचा आत्मा तसाच राहिला — त्याच उत्कट भावना, तेच कौशल्य, निर्मितीतून मिळणारा आनंद आणि समाधानही तेच. आणि हा आनंद केवळ कलाकारापुरताच मर्यादित राहत नाही; तर त्या कलेची अनुभूती घेणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचतो. चित्रकलेपासून ते शिल्पकलेपर्यंत आणि संगीतापासून ते नृत्यकलेपर्यंत — प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहे; पण त्या शास्त्राची चौकट होत नाही. प्रत्येक कलेचे काही नियम आहेत; पण त्या नियमांची बंधनं होत नाहीत. कारण, कला स्वच्छंद असते!

कला माणसाला व्यक्त व्हायला मदत करते, माणसातलं माणूसपण जपते, पर्यायाने माणसालाच जपते. कला ही कलाकारांची ओळख बनते आणि कलाकृतींमध्ये कलाकाराच्या भावनांची, माणूसपणाची, अस्तित्वाची, झलक दिसत राहते.  मनापासून कलेची साधना करणाऱ्या कलाकाराला जसं समाधान मिळतं, तसंच कलेचा मनापासून आदर करणाऱ्या कलासक्तालाही मिळतं. प्रेक्षक किंवा श्रोते होणं तसं सोपं; पण खऱ्या अर्थाने कलासक्त होणं कठीण. कोणत्याही कलेबद्दल आत्मीयता बाळगणं, त्यामागच्या कष्टांची जाण असणं, कलाकाराचा आणि त्याच्या कलाकृतीचा मनापासून आदर करणं' म्हणजे कलासक्त होणं.

अलीकडचीच एक घटना — सोशल मीडियावर Studio Ghibli स्टाईल AI-Generated Imagesना अचानक पेव फुटलं. Ghibli या जपानी ॲनिमेशन स्टुडिओचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे – प्रत्येक फ्रेम ही कलाकारांनी तासनतास घेतलेल्या मेहनतीतून साकारलेली असते आणि त्यातील बारकाव्यांमुळे प्रत्येक पात्राचं भावविश्व जिवंत झाल्याचं भासतं.

पण जिथे AIकडे भावना नाहीत, तिथे ह्या कृत्रिमतेला ‘कला’ म्हणावं का? ती केवळ नक्कल ठरते — आणि कलाकारांच्या कष्टांचा अपमानदेखील. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला; पण खरे कलासक्त रसिक मात्र याला विरोध करत उभे राहिले. यामुळे सिद्ध झालं की कलेतील कृत्रिमता ही कलाकारालाही खटकते आणि कलासक्तालाही. कलाकार कलेला जिवंत ठेवतो, कला कलाकाराला जगवते, आणि कला माणसांच्या जगण्याला अर्थ देते.

ही जगण्या-जगवण्याची कला म्हणजे – मन रिझवणारा आणि कलासक्त रसिकांना थिजवणारा कौशल्यपूर्ण आविष्कार! म्हणूनच कलेमुळे जगणाऱ्या, कलेसाठी जगणाऱ्या आणि कलेला जीवन मानणाऱ्या, अशा सर्वांना — जागतिक कला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 


-अनुष्का बिराजदार.


Monday, March 31, 2025

डॉ. आनंदीबाई जोशी: भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांचा प्रेरणादायी प्रवास

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी या केवळ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर नव्हत्या, तर त्या शिक्षण, धैर्य आणि समाजसुधारणेच्या दिशेने घडलेल्या महत्त्वाच्या प्रवासाचे प्रतीक होत्या. 31 मार्च 1865 रोजी पुण्यात जन्मलेल्या आनंदीबाईंच्या जीवनप्रवासाने अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. त्या यमुना या नावाने जन्मल्या, मात्र विवाहानंतर त्यांचे नाव आनंदीबाई झाले. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्त्री समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मार्ग निर्माण केला.

त्यांच्या जीवनाची सुरुवात एका पारंपरिक कुटुंबात झाली, जिथे स्त्रियांनी शिक्षण घेणे दुर्मिळ होते. नऊव्या वर्षीच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला, जे स्वतः एक प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. चौदाव्या वर्षी मातृत्वसुख लाभले, मात्र मुलाच्या आजारपणात योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा धक्का त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी ठरवले की अशा परिस्थितीत अन्य कोणत्याही आईला जावे लागू नये, आणि त्यामुळेच त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणेच कठीण होते, आणि डॉक्टर होणे तर कल्पनेपलीकडचे होते. मात्र, गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याकाळच्या मानसिकतेनुसार एका हिंदू स्त्रीने परदेशात जाऊन शिकणे हे समाजाला अजिबात मान्य नव्हते. लोकांनी टीका केली, विरोध केला, पण आनंदीबाईंनी निश्चय सोडला नाही. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्या बोटीने एकट्याच अमेरिकेला रवाना झाल्या आणि सात समुद्र पार करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या आणि त्यांनी देशातील महिलांसाठी शिक्षण व आरोग्याच्या नव्या संधी निर्माण केल्या.

शिक्षणाच्या प्रवासात त्यांना अनेक अडथळे आले. अमेरिकेतील हवामानामुळे त्यांचे आरोग्य खालावत गेले. त्यांना क्षय झाला, पण तरीही त्या थांबल्या नाहीत. शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या आणि आपल्या देशातील स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न पाहू लागल्या. दुर्दैवाने, त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि अवघ्या 22व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी उभारलेला मार्ग पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरला. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की, स्वप्नं पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांनी सामाजिक बंधनांना झुगारले, शिक्षणासाठी कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयश आलं तरी मागे हटल्या नाहीत. त्यांची कथा हे दर्शवते की शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी झगडावे लागते.

आज, त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि चिकाटीचा आदर्श घ्यायला हवा. त्यांनी निर्माण केलेला मार्ग आपण पुढे चालत राहिलो, तर भारतात आणखी असंख्य आनंदीबाई घडतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


-मृण्मयी पाटस्कर


Wednesday, March 19, 2025

रंगभान

मला मोहित करतात रंग, त्यांच्या छटा, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, सारंकाही. जगातले आणि आयुष्यातले रंग सारखेच असं वाटलं तेव्हा कळलं की एकेका आयुष्यानेच जग रंगीत होत राहातं, कधी प्रेमाने लाल, दुःखाने काळं किंवा स्थैऱ्याने पांढरंही. कोणताच रंग नसलेला 'ना'रंगी रंग जसा पाण्याला असतो तसा तुम्हां-आम्हालाही तो निसर्गदत्त असतो. जिथे जन्मावं, ज्या स्थितीत राहावं, वाढावं तिथला रंग पांघरत राहतो आपण. तो रंग नक्की ल्यावा मात्र ल्यावा तो विवेकाच्या गाळण्यातून गाळून. असा विचार केला तर किती सहज वितळून जातो पदराखाली जपलेला खोटा अभिमान, माणसातली आणि खरंतर मनातली दरी लीलया भरून काढतात हे रंग... मात्र पूर्वसुरींच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळते की ह्या रंगांचं प्रयोजन फार व्यापक आहे, बघावा तसा पर्वत दिसावा तसेच हे रंगदेखील आहेत. सृष्टीच्या व्यापकतेचं वैभव हे रंगच तर दाखवतात. समुद्र आणि वाळवंटाचा रंग एक नाही म्हणूनच दोघांना त्यांचं-त्यांचं महत्त्व आहे, माहात्म्य आहे. ह्या रंगांकडे जेव्हा भौतिकदृष्ट्या बघतो तेव्हा खरंच अवाक् होऊन जातो. शरीरातल्या विशिष्ट पेशी दृष्याच्या रंगभानासाठी कारणीभूत ठरतात असं शास्त्र सांगतं. माणसा-माणसात त्यातले पुसटसे भेद आणि त्याचे आजारही सांगतं, ते खरं देखील आहे पण यावरून काही अंशांनी तरी माणसांची दृष्टी वेगळी असते हेच स्पष्ट होतं. हे कळल्यावर दृष्टी वेगळी असल्याने माणसांचा दृष्टिकोन वेगळा असणारच हे मनाला इतकं पटतं की मतभेदाची कित्येक कारणं समूळ मावळून जातात.

कोट्यावधी लोकांचं जीवन युगांपासून व्यापून राहिलेले धर्म म्हणे एका रंगाने दर्शविता येतात, हे रंगांचं केवढी माहात्म्य म्हणावं ! इथे आठवतो तो शाळेतला प्रयोग, प्रिझम मधून गेलेले सगळे रंग शेवटी पांढर्या रंगामधे परिणत होतात, तेचा वाटतं की शेवटी शुद्ध श्रद्धेच्या चौकटीतून गेलेले सगळेच रंग एकाच चैतन्यात मिसळणार आहेत. तेव्हा माझ्या रंगाचा मला अभिमान असला तरी दुसऱ्याच्या द्वेषाचं कारणच उरत नाही. म्हणून महत्व द्यायचं ते प्रत्येकाच्या स्वतंत्र असण्याला, दिसणं हे काळाच्या ओघात बदलत राहणारच असतं. शेवटी सगळे सारखाच श्वास घेतात, कुणाचा श्वास भगवा नसतो किंवा हिरवाही... जसा शब्दांसाठी अर्थ तसा रंगांसाठी भाव असतो. जे शब्दांतून सांगता येत नाही, अभिनयातून दाखवता येत नाही ते रंग दर्शवतात. कलाकाराच्या भावावस्थेपर्यंत नेणारी शिडी म्हणजे रंग. भान हरपून टाकणारे तसं भानावर आणणारेही रंगच. प्रत्येकाला आपलं आयुष्य बसवता येतं एखाद्या रंगामध्ये किंवा दोन-चार रंग मिसळून साकारलेल्या एखाद्या रंगामध्ये, मात्र त्याला धाडस हवं हे नक्की. नाही म्हटलं तरी आजच्या काळात प्रत्येकाच्या विचारांना एखादा रंग लागलेलाच असतो. अशा रंगांच्या छटा फार बोलक्या असतात. माणसाला अगदी सुरुवातीला चित्र काढता येत होतं पण तो तिथे थांबला नाही, पाना-फुलांच्या रसाने तो त्यामधे रंग भरू लागला, स्वतःचे क्षितिज स्वतः विस्तारू लागला. आजची परिस्थिती तशी फार वेगळी, पण हृदयाची तहान अगदी तिच. आयुष्यात रंग भरण्याची, आयुष्य रंगीत करण्याची. प्रत्येकाच्या मनातल्या रंगांना कर्माची जोड मिळतेच असं नाही, पण रंगांची ओढ मात्र कायम राहते, जशी मनात तशी इतिहासाच्या पानांवरही. कधी हातात नसलेले अनपेक्षित रंग उधळले जातात आणि नव्हत्याचं होतंदेखील होतं.

रस्त्याच्या कडेला फुलं विकून पोट भरण्याची ईच्छा उरात बाळगणाऱ्या मुलाच्या निरागस डोळ्यांत मला हेच रंग दिसतात किंवा त्याच्यासमोरून गाडीच्या खिडकीतून हात दाखवत जाणाऱ्या एखाद्या सोनूच्या डोळ्यातही अगदी तेचं रंग असतात. ए.सी.मधे बसलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या माणसांच्या स्वप्नातही हेच रंग जाणवतात, खरंच माणसाचं अंतरंग इतकं रंगीत असतं का ? 


 -अनीश जोशी

Saturday, March 8, 2025

जागतिक महिला दिन!


हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही चालू असलेल्या संघर्षाची! या उत्सवाची सुरुवात रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. ८ मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. १९०८ मध्ये १५०० महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता. रशियातील महिलांनी ‘महिला दिवस’ साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. तर युरोपमध्येही महिलांनी ८ मार्च रोजी शांतीच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.

महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात, मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. २०२५ सालच्या जागतिक महिला दिनाची संकल्पना आहे – ‘सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी : हक्क, समानता, सक्षमीकरण.’

परंतु ही केवळ घोषणा नसून स्त्रीत्वाने संपूर्ण जगाला घातलेली साद आहे—एक परिवर्तनाची मागणी. स्त्री शक्तीच्या सन्मानासोबत त्या शक्तीच्या न्यायाची हाक. इतिहासाच्या कपाटात अनेक कथा दडल्या आहेत. काही स्त्रियांनी क्रांती घडवली, काहींनी विद्रोह केला, तर काहींनी सहनशीलतेच्या कडेलोटावरही आत्मसन्मान जपला. ऋग्वेदातील गार्गी, मैत्रेयी, राणी लक्ष्मीबाई, रोजा पार्क्स, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, मारिया क्युरी—अशा अनेक स्त्रिया जागतिक, राष्ट्रीय, शहरी, ग्रामीण स्तरावर आदर्श ठरल्या.

पण ८ मार्च हा दिवस फक्त या महान स्त्रियांना स्मरण्याचा आहे का? की नवीन उदाहरण घडवण्याची प्रेरणा घेण्याचा?

मला वाटते—दोन्हीही नाही.

या ओळखींच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिचे स्त्रीत्व मुक्तपणे जगता यावे, हाच या दिवसाचा खरा अर्थ. नेहमीप्रमाणे यावर्षीही ८ मार्च हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल, पण या आनंदाच्या पलिकडेही एक कटू वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अन्याय सहन करत आहेत, आत्मसन्मानाच्या आणि स्वातंत्र्याच्या एका खोल दीर्घ श्वासाची याचना करत आहेत. हे चित्र बदलायला किती काळ लागेल, हे काळच ठरवेल.

परंतु मला ठाऊक आहे की, काही पुरुषी क्रौर्याच्या पलीकडेही एक पुरुषी करुणेचा उजेड आहे. त्या पुरुषी ममत्त्वासाठी माझा हा लेख. स्त्रीत्वाच्या जाणिवेच्या शब्दांत अरुणा ढेरे म्हणतात—

"की हिला मातीचं बळ मिळो,

लहरी वादळाचं पिसाटपण

समजून रानावनात तगण्यासाठी...

की हिला पाखरांच्या संवादाचं सुख कळो...

वाढण्याच्या कळा सोसत पानांत येण्यासाठी...

ही होईल जर स्वतःच्या ओळखीइतकी खोल,

तर टिकवील आपोआपच स्वप्नांच्या शिरेशिरेतली ओल....”

एकीकडे मातीचं बळ आणि वादळाचं पिसाटपण अंगी रुजवणाऱ्या स्त्रीला, पाखरांच्या संवादाचं सुख कळण्याइतकी शांतीही मिळो. तिच्या स्वप्नाइतकीच तिला तिची खरी ओळखही कळो.

उत्सव होवो तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कसोटीचाही—

ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचाही,

आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.


-प्रतीक्षा ओंबळे

Sunday, February 9, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Friday, January 3, 2025

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.

माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:

ज्ञान नाही, विद्या नाही  

ते घेण्याची गोडी नाही  

बुद्धी असूनही चालत नाही  

त्यास मानव म्हणावे का?

या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?

तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:

सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे  

दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे


ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!


- श्रुती शिंदे

Wednesday, January 1, 2025

नवे वर्ष, नवा संकल्प

वर्ष सरत आहे... अनेक सण-समारंभ, अनेक चित्रपट, काही सुखद, काही दुःखद अशा आठवणी; अनेक किस्से, नवीन धडे, आणि दरवर्षीप्रमाणे भरपूर उन्हाचे, पावसाचे, आणि थंडीचे दिवस अनुभवत अनुभवत २०२४ वर्षाचा शेवट जवळ आला आहे. आता आपण सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. आपल्यापैकी अनेकांनी नवीन वर्षासाठी संकल्प ठरवले असतील. कदाचित २०२४ साली राहून गेलेल्या गोष्टींचाही समावेश या संकल्पांमध्ये असेल. नवीन वर्ष नेहमीच ३६५ दिवसांची भेट घेऊन येतं, पण जसं नवीन फुलं ओंजळीत घ्यायची असतील, तर जुनी कोमेजलेली फुलं ओंजळीतून सोडावी लागतात, तसंच आपल्या मनाचंही आहे. जुन्या आणि कटू आठवणींना निरोप दिल्याशिवाय नवीन वर्षातील संधींना, क्षणांना, आठवणींना साठवण्यासाठी जागा मिळणार नाही.


अनेकदा आपण नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने, उत्साहाने करतो, पण मागील कटू आठवणींना कायमचा निरोप देऊन नवीन सुरुवात करायचं विसरतो. मग त्या आठवणींचं ओझं आपल्या मनावर राहतं. लांबच्या प्रवासाला निघायचंय, तर जड ओझं घेऊन कसं चालेल? आपल्याला तर पुढील ३६५ दिवसांसाठी सज्ज व्हायचं आहे!

जेव्हा आपण सगळी नकारात्मकता आपल्या मनातून काढून टाकतो, तेव्हाच सकारात्मकतेने, आनंदाने, आणि उमेदीने नववर्षाचं स्वागत करता येतं. कोणतंही वर्ष लक्षात राहतं ते त्या वर्षभरात जोडलेल्या नात्यांमुळे, नवीन मित्र-मैत्रिणींमुळे, अनुभवांमुळे, शिकलेल्या गोष्टींमुळे, चाखलेल्या नवीन पदार्थांमुळे, पाहिलेल्या प्रदेशांमुळे, वाचलेल्या पुस्तकांमुळे, ऐकलेल्या गाण्यांमुळे, केलेल्या प्रयोगांमुळे, मिळालेल्या यशामुळे, आणि प्रसंगी केलेल्या संघर्षांमुळे. या सगळ्यातून मिळालेल्या अनुभवांमुळेच आपण घडतो आणि समृद्ध होतो. म्हणूनच ‘अनुभवाचे बोल’ महत्त्वाचे मानले जातात.त्या वर्षातील चांगल्या-वाईट सर्व अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीची शिदोरी घेऊन नवीन वर्ष प्रसन्न मनाने सुरू करूया!

नवीन वर्ष आलं की आपण अनेक संकल्प करतो. त्यातला एक संकल्प असा असावा की नकारात्मक आणि त्रासदायक गोष्टींना फार काळ मनात साठवून न ठेवता त्यांना अलवार सोडून देऊ. त्यामुळे नववर्षात चांगल्या आठवणी, किस्से, प्रसंग, आणि अनुभव साठवता येतील. असं केल्यास येणारं वर्ष आपल्या आयुष्यात आनंदाची भर घालेल.

माझ्याकडून तुम्हा सर्वांना येणाऱ्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!


-मनाली देशपांडे


Tuesday, November 19, 2024

मतदानाचा हक्क, तुमची ताकद!


लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालणारे सरकार. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क फक्त एक अधिकार नाही, तर एक जबाबदारी आहे, जी आपल्या देशाच्या भवितव्याला आकार देते. सरकारी निर्णयांवर व्यक्ती प्रभाव टाकू शकतील, अशा सर्वांत महत्त्वाच्या मार्गांपैकी एक म्हणजे मतदान. मतदान म्हणजे कार्यालयासाठी किंवा एखाद्या समस्येच्या प्रस्तावित निराकरणासाठी उमेदवाराची पसंती व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग. मतदान प्रामुख्याने राष्ट्रीय किंवा प्रादेशिक निवडणुकीसाठी होते; मात्र स्थानिक व लहान सामुदायिक निवडणुकाही सरकारमधील वैयक्तिक सहभागासाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. संविधानातील सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. या अधिकारामुळे साधा सामान्य माणूस असो वा श्रीमंत, उच्चशिक्षित असो किंवा अशिक्षित, प्रत्येकाला मत देण्याचा समान अधिकार प्राप्त झाला. याच अधिकारामुळे आपल्या देशातील लोकशाहीचे मूळ मजबूत झाले. पंतप्रधानांपासून सरपंचांपर्यंतच्या निवडीचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. यामुळेच न्याय व हक्कांची जाणीव होऊ लागली आणि स्वातंत्र्याची खरी अनुभूती मिळाली.

आज भारताची लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही मानली जाते, याचे मुख्य कारण म्हणजे तिची प्रभावी निवडणूक प्रक्रिया. दर पाच वर्षांनी निवडणूक होत असल्याने प्रत्येक नागरिकाला आपल्या मतांच्या ताकदीची जाणीव होते. संविधानाने दिलेले समानता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्याचे सामर्थ्य आपण आपल्या मतदानाने सिद्ध करू शकतो. निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणारा कोणीही असो, सत्ता कोणाचीही असो, संविधानाचे मुख्य तत्त्व कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच, आपल्या देशाच्या लोकशाहीवर अभिमान ठेवून, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मतांत देशाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच म्हणतात, "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" मतदान हा अधिकार केवळ वैयक्तिक स्वातंत्र्यावर आधारित नसून, तो देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा अधिकार जबाबदारीने वापरून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" हे केवळ घोषवाक्य नाही, तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी सत्यता आहे.

आपल्या एका मताने देशाच्या भवितव्याला आकार देता येतो. लोकशाहीची खरी ताकद तिच्या नागरिकांच्या सक्रिय सहभागात आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मतदान करायला हवे. मतदान करणे म्हणजे केवळ आपला हक्क बजावणे नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा वाटा उचलणे आहे.

"आजचा मतदार, उद्याचा देश घडवणारा!"

जय हिंद! जय भारत!


-जिजाऊ शेळके

Thursday, October 31, 2024

राष्ट्रीय एकता दिवस


एक काठी असेल तर ती सहज मोडता येते; परंतु काठ्यांचा गठ्ठा तितक्‍या सहजतेने मोडता येत नाही. लहानपणापासूनच अशा छोट्या गोष्टींतून आपल्यात एकीचे बळ खोलवर रुजवले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच एकीच्या बळाचा वापर करून भारतातील विविध संस्थानांना एकत्र केले आणि जणू एका शिल्पकाराप्रमाणे भारताला नव्या रूपात घडवले. सरदार वल्लभभाई पटेल (भारताचे लोहपुरुष) यांनी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी विभाजन संपवून भारताला एकसंध राष्ट्र बनवण्यास मदत केली. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा त्याच्या विविधतेतून निर्माण झाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने या विविधतेचे परिवर्तन विषमतेत नव्हे, तर एकतेत करण्याचा ध्यास वल्लभभाईंनी उरी बाळगला, आणि समर्थपणे या विविधतेतून राष्ट्रात एकता निर्माण केली. आपल्यामधील भाषिक, पारंपरिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विविधतेत बंधुत्वाची भावना टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो.


आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका देखील याच मूल्यांची पायाभरणी करते आणि लोकांमध्ये निर्धार, समानता, आणि विश्वास या तत्त्वांचा पाया घालते. भारताचे नागरिक म्हणून या मूल्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या मनात स्वतःच्या संस्कृतीचा गर्व असलाच पाहिजे; परंतु त्याचबरोबर दुसऱ्याच्या संस्कृतीचा आदर आणि सन्मान बाळगण्याची भावना हवी. मात्र, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत असताना आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे – आजच्या काळात एकता या संकल्पनेचा अर्थ काहीसा बदलला आहे का? एकता साजरी करत असताना, ती खऱ्या अर्थाने अंमलात येत आहे का, की केवळ प्रतीके उरली आहेत? विविधतेतून एकता साधण्याचा उद्देश जोपासण्यासाठी आज आपल्या समाजात समजूतदारपणा, सहिष्णुता, आणि सर्वांचा समान आदर वाढवण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हेच खरे तर राष्ट्रीय एकात्मतेची खरी परीक्षा आहे.


-आर्यन पाध्ये

Sunday, October 20, 2024

बोलतो मराठी, जपतो मराठी

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके.. 

   संत ज्ञानेश्वरांचे हे वचन आपण वर्षानुवर्षे वाचत ऐकत आलोय आणि इतक्या वर्षांपूर्वी आपल्या संतांचा या भाषेवरचा विश्वास आज जगाला मान्य करावा लागत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वाचकहो बातमी आली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि सगळ्या मराठी भाषिक लोकांनी तो आनंद जगाला दाखवूनही दिला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि प्रधानमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हा 2013 पासून चालत आलेला संघर्ष शेवटी ३ ऑक्टोबर २०२४ ला विजयावर आपले नाव कोरून थांबला आहे. आता प्रवास सुरू झालाय विजयानंतरचा.. 

   मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे मराठी भाषिकांवर खूप मोठी जबाबदारी आली आहे. हा दर्जा टिकवण्याची..! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मागच्या २००० वर्षांचा मराठी भाषेचा इतिहास पाहिला आणि अभ्यासला गेला आणि तो दर्जा राखण्यासाठी आपल्याला इथून पुढे काम करावे लागणार आहे.

   एखादी भाषा अभिजात भाषा ठरण्यासाठी जी काही नियमने आहेत त्यामध्ये प्रमुख अट अशी आहे की त्या भाषेला कुठूनही उसना न घेतलेला असा साहित्यिक वारसा हवा आणि असा खूप प्रबळ वारसा मराठी भाषेच्या नशिबी आहे. मराठी भाषा अभिजात भाषा आहे या बद्दल कुणाच्याच मनात शंका नव्हती. हा संघर्ष होता आपल्या विश्वासाला ठोस पाठिंबा मिळण्यासाठीचा. आता आपल्याला काय करायचंय..? तर मराठी भाषेचं मराठीपण टिकवायचं आहे..! मराठी मध्ये इतर भाषांमधले शब्द यावेत पण त्यांनी मराठी भाषेला गिळू नये. मराठी मध्ये भाषाशुद्धीचे प्रयत्न या आधीच झालेले आहेत. आपण त्यावरून आदर्श घेऊन ती भाषाशुद्धी अंगीकृत करायला हवी.आपल्या रोजच्या बोलण्यात जरि आपण मराठी प्रतिशब्दांचा वापर करीत बोललो तरी मराठी भाषेचा गोडवा टिकवण्यासाठी ते पुरेसं असेल. जितका अभिमान आपल्याला आज वाटतो आहे तितकीच जास्त जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची जाणीव आपल्याला हवी. लक्षात ठेवायची गोष्ट एकच की संघर्षाने विजय मिळतातंच.. मिळालेलं वैभव टिकवणं हा खरा पराक्रम!


-Darsh Samant

Sunday, September 22, 2024

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात.  जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबिया मधल्या अनेक नद्या स्वच्छ केल्या. ते नेहमी म्हणायचे की "कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही" त्यांचं हे वाक्य आजही महत्वाचे वाटते.

नदी ही देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असते. माणसाच्या अनेक महत्वाच्या दैनंदिन गरजा ह्या बहुधा नदीवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला  जीवन म्हटलं जात. भारत देशात 100 हुन अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. जगातील कतार, युएई, मालदीव, बहरीन, कुवेत ह्या देशांमध्ये नदी वाहत नाही. परंतु भारतात अनेक नद्या आहेत व या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्या द्वारे पाणी दिले जाते. राज्यातील भीमा, मिठी, मुळा, मुठा, पवना,गोदावरी अश्या एकूण 53 नद्या ह्या प्रदूषित झाल्याचे प्रदूषित मंडळाच्या अहवालात दिले आले आहे. मुख्यता हे प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये नदी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली आहे व या समितीमार्फत राज्यातील प्रदूषित नद्यांचा कृती आराखडा तयार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहे.

देशातील अनेक महत्वाच्या नाद्यांसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे नदीचे पुरातन काळापासून मानवी जीवनाशी व संपूर्ण सजीव सृष्टीशी एक महत्वाचे नाते जोडले गेले आहे. आपण आत्तापर्यंत असे ऐकले आहे की भारतातील अनेक नद्या एकाच दिशेने वाहतात म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि बहुतांश नड्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडेच असतो परंतु आपल्या देशातील नर्मदा ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

एकंदरीत भारतातील व जगातील अनेक नाद्यांचा विविध पद्धतीचा इतिहास आहे. नदी जगली तर गाव जगेल असं म्हटलं जात त्यामुळे नदी जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने नदी संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलूया.

-Ramesh Kachare

Sunday, July 21, 2024

गुरु: साक्षात् परब्रह्म!

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः 

गुरुर्देवो महेश्वरः। 

गुरुः साक्षात् परब्रह्म 

तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजेच 'प्रकाश'. ज्या ज्या वेळी शिष्य हा अज्ञानाच्या अंधारात असतो, त्या त्या वेळी प्रकाशाच्या दिशेने त्याला उजागर करणारा मार्ग म्हणजे गुरूचे मार्गदर्शन. या ब्रह्मांडामध्ये गुरूची व्याख्या कुठेही कोरली गेली नाही. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खऱ्या वाटेचे किंवा मार्गाचे दर्शन घडवणारा मार्गदर्शक हा गुरू असतो. 

प्राचीन भारतापासून ते आजच्या स्वतंत्र भारतापर्यंत गुरू - शिष्याचं नातं हे आजही तेवढंच अमर आहे. याच वैशिष्ट्यामुळे गुरुपौर्णिमा भारतात वर्षानुवर्षे साजरी केली जाते. गुरूची महती प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची असते म्हणूनच लहानपणापासून 'आचार्य देवो भव' ही शिकवण दिली जाते. एक मार्गदर्शक अथवा गुरू हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही प्रत्येक शिष्य श्रद्धापूर्वक साजरी करतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मापासून मिळालेलं वरदान म्हणजेच साक्षात गुरू - रूपी आई असते. आपल्या जीवनाचे संगोपन करताना संस्कार, शिकवण, उच्चविचार,सद्बुद्धी तिच्याकडून प्राप्त होत असते. आई प्रमाणेच आपल्या आयुष्यात वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र व चांगली पुस्तके आपले गुरू होतात. खरं तर गुरू मिळणे हे तर भाग्याचे लक्षण समजले जाते.

प्राचीन भारतामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी घराचा त्याग करून ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास अशा आश्रमात जाऊन गुरूकडून ज्ञानप्राप्ती करत असत. त्या काळातील सर्वश्रेष्ठ विद्येची ठिकाणे तक्षशीला, नालंदा ही होती. भारतात प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरा आहे. कृष्णाचे गुरू सांदिपनी, अर्जुनाचे गुरू द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांचे गुरू परशुराम, चंद्रगुप्ताचे गुरू चाणक्य, स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास, अनेक भिखुंचे तथागत गौतम बुद्ध, व आजही अनेक मुलींसाठी ज्ञानसरस्वती सावित्रीबाई फुले व अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकरांचे गुरू आचरेकर सर, ही गुरू शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे.

महाभारतात पांडवांचा विजय होण्यामागचे कारण म्हणजे द्रोणाचार्यांचे मार्गदर्शन. चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली मगधचा विस्तार करणारा राजा चंद्रगुप्त मौर्य, अशी कित्येक महान उदाहरणं भारत देशाच्या भूमीवर आजही अमर आहेत. 

संपूर्ण भारत देशाला लाभलेल्या या गुरु-शिष्याच्या वारश्यामुळे आज आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. अनेक प्राचीन श्लोक आज आपल्या मुखोद्गत आहेत, कारण  इतिहासात सांगितल्याप्रमाणे, श्लोक, संस्कृती,परंपरा या सगळ्याचा वारसा एका गुरूकडून शिष्याकडे पोहोचला आहे.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!

-Ashwini Shende 

 

Wednesday, July 17, 2024

वारी माणुसकीची..! वारी एकतेची..! वारी प्रेमाची...!!!


आव मोठा, भाव खोटा 

   जनात- मनात 

   दुजा भाव कशासाठी

   तुझ्यात माझ्यात ,

   जनतेला घेऊनिया 

   जातो संग संग... 

   माणसात माणूस दिसता 

तोचि पांडुरंग.....


               खरंतर आषाढी एकादशी व वारी यांची सुरुवात कधी झाली? कशी झाली? याचं महत्त्व नेमकं काय? या सर्व प्रश्नांचा इतिहास खरंतर खूप मोठा आहे. पण मला वाटतं की या वरील ओळी या संदर्भात सर्वच काही व्यक्त करतात.. माणसांपासून माणूस दूर होत जाणाऱ्या आजच्या या समाजात, एखादी व्यक्ती प्रगती करताना त्याचा पाय खेचणाऱ्या आजच्या समाजात, माणुसकी हरवलेल्या आजच्या समाजात, थोडक्यात खोटे मुखवटे चढवून काळाच्या पटलावर चालणाऱ्या आजच्या याच समाजाला आषाढी एकादशी एक सुंदर उत्तर आहे असं मला वाटतं.

             लाखोंच्या संख्येने जेव्हा वारकरी संप्रदाय तहान- भूक- ऊन- पाऊस- थंडी या कशाचीच परवा न करता हातात झेंडे, निशाणी घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन आणि ओठी फक्त 'हरि' नामाचा जप करत कोणताच भेदभाव न करता जेव्हा आपल्या पांडुरंगाचे तेजोमय रूप पाहण्यासाठी पंढरीची वाट धरतो तेव्हा खऱ्या अर्थाने जातीधर्माचे असंख्य बंधारे आपोआप तुटतात आणि प्रेमरूपी चंद्रभागेचं पाणी पांडुरंगाच्या पायाशी जाऊन पोहोचत आणि मग 28 युगं भक्तांच्या प्रेमापोटी विटेवर उभा राहिलेला माझा पांडुरंग सुद्धा सुखावतो...!

              आज या समाजात प्रत्येक क्षेत्रातच बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. स्त्रियांवर होणारे अन्याय- अत्याचार, तृतीयपंथीयांच्या हक्कांची केली जाणारी गळचेपी, जातीनिहाय केले जाणारे राजकारण, आपापल्या जातीभोवती बांधल्या जाणाऱ्या भिंती, प्राणी- पक्षी- झाडे यांच्या केल्या जाणाऱ्या कत्तली, यांसारख्या गोष्टीमुळे समाज सर्व अर्थाने ढवळून निघाला आहे. एकमेकांबद्दलची वाढत जाणारी इर्ष्या असूया या गोष्टी वाढत चालल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकोबा यांनी पसरवलेला मानवतेचा संदेश कुठे ना कुठेतरी आज संपतं आहे.पण तरीही..

              कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प झालं असताना, संपूर्ण जग थांबल असताना, खऱ्या अर्थाने माणूस माणसापासून लांब होता तरीही एकत्र येऊन अनेक हातांनी या काळात दिवे लावले, हातात घंटा, टाळ घेऊन 'हम सब एक है' अशी हाक दिली त्यावेळेला ज्ञानेश्वरांची मानवतेची शिकवण पाहायला मिळाली.

          'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या उक्तीची आपल्याला प्रचिती आषाढी एकादशीच्या वारीतून येते. सर्व संतांनी आपल्याला सर्व धर्म समभाव हा मंत्र सांगितला आणि मग या एकादशीपासून वारीपर्यंतचा प्रवास सुरू झाला असावा. हिच वारी वर्षांनुवर्षे चालत आहे न थकता, न थांबता, अशीच युगानुयुगे चालत राहील. जी मानवतेची असेल..एकतेची असेल.. प्रेमाची असेल....!

  हीच शिकवण लक्षात घेऊन समाजातले वाद- विवाद संपून प्रेमाची बीजे पेरली जातील तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला पांडुरंग हा प्रत्येकामध्ये दिसायला लागेल आणि मग ही वारी माणसापासून माणसापर्यंतची असेल..!!

 -Shivam Jadhav

Wednesday, March 27, 2024

जागतिक रंगभूमी दिन


 

प्रिय रंगभूमी,

शिर - साष्टांग दंडवत. 

जशी कृष्णासाठी राधा त्याची गुरू, त्याची मैत्रीण, त्याची प्रेयसी, त्याची हितचिंतक आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती तशीच अनेक कलाकारांसाठी, रसिकांसाठी तू आहेस. आई आणि गुरू होऊन तू कित्येक कलाकार घडवलेस, मैत्रिणीप्रमाणे त्यांची साथ दिलीस, मार्गदर्शकाप्रमाणे त्यांच्या प्रगतीचा पाया रचलास आणि प्रेयसी म्हणून तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलेस. 

        खूप वर्षांपूर्वी मी तुला विचारले होते की तुझं नाव "रंगभूमी" असं का आहे गं? तेव्हा तू म्हणालीस, "जसं तुझ्या जगातल्या आकाशामध्ये तू रंगांची उधळण बघतेस आणि हरखून जातेस तसं माझ्या जगात बघ! माझ्या जगातली तर भूमी सुद्धा रंगांची आहे."

       खरं आहे गं! ऊन पावसाच्या खेळामधून विविध रंगी इंद्रधनु एका क्षितिजाला दुसऱ्या क्षितिजाशी जोडते तसेच विविध रसांची निर्मिती ही एका कलाकाराला प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडते. यातून कधी हास्याचे फवारे फुलतात, तर कधी अश्रूंच्या धारा लागतात. कधी स्वरतालांची मैफिल सजते, तर कधी सामाजिक प्रश्नाने अस्वस्थता येते. तू कधी प्रेक्षकांना लहान मुलांप्रमाणे जादूच्या नगरीत फिरवतेस तर कधी जगाच्या वास्तवतेचे भान देतेस.

       पडद्यामागील कलाकार, रंगमंचावरील नट आणि प्रेक्षागृहातील प्रेक्षक यांच्या उत्तम समीकरणातून नवरसांची उधळण होते आणि एखाद्या प्रयोगाची कलाकृतीमध्ये निर्मिती होते. एखादी संकल्पना आपण वाचतो, ऐकतो त्यापेक्षा जेव्हा आपण प्रत्यक्ष सादरीकरणातून बघतो, तेव्हा ती जास्त भावते कारण आपण ती समक्ष अनुभवतो आणि त्यात आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची ताकदही असते.

          दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त वयाची चिरतरूण आहेस तू. तुझ्या जगामध्ये तू स्थळकाळाचे भान हरपवतेस. स्वत्व विसरायला भाग पाडतेस तर कधी परकाया प्रवेशही करून घेतेस.

      "आत्मविरोधी कुतूहलधरा" या उक्तीप्रमाणे कधी कधी स्वतःचे नाव ही ओळख विसरून तुझ्या जगातलं नाव हीच एखाद्याची ओळख बनते. अशा ओळखीमुळे लोक कधी राग राग करतात, कधी हळहळतात, तर कधी तुझ्या जगातले क्षण आठवून खळखळून हसतात. थोडक्यात तू जसं मनोरंजनाचे काम करतेस तसेच समाजप्रबोधनाचेही काम करतेस.

       सिनेमा सारख्या माध्यमाला रिटेक चा पर्याय असतो. पण रंगमंचाच्या प्रवासामध्ये रिटेक सारखे परतीचे दोर कापलेले असतात. म्हणून तुझ्यावर सादर होणारी प्रत्येक कृती हा उत्स्फूर्त "प्रयोग" असतो. हा प्रयोग कलाकृती म्हणून जरी प्रेक्षकांना स्वर्गानुभव देत असला तरीही कलाकाराला तू ही जाणीव करून देतेस - की प्रत्येक वेळी इथे काहीतरी नाविन्यपूर्ण घडणार आहे. म्हणून कलाकराला माहिती असते की प्रत्येक सादरीकरण हा एक प्रयोग आहे. यामुळे त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. बघ ना, माणसातून कलाकार निर्माण करण्याचे काम तर तू केलेसच; पण कलाकारातून माणूस घडवण्याचे कामही तू किती सहज करून गेलीस!!

      समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली, पण तुझ्या झालेल्या मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांची मोजदाद करणे केवळ अशक्य. परंतु इथे फक्त कलाकार रुपी रत्नांनाच महत्त्व न देता छोट्यातले छोटे काम करणाऱ्यालाही तेवढेच महत्त्व असते. तिसरी घंटा वाजवणाऱ्यापासून ते लेखक - दिग्दर्शकापर्यंत सर्वांनाच तू त्या कलाकृतीचा अविभाज्य भाग बनवतेस.

       जसं भूमी एका बीजापासून गगनचुंबी वृक्षापर्यंतच्या प्रवासाची साक्ष आणि साथ देत असते तसेच तू अनेक कलाकृतींची, अनेक कलाकारांची आणि अनेक रसिकांची ही साथ आणि साक्ष देत आली आहेस.

     अनादी कालापासून चालत आलेला तुझा प्रवास अनंत काळापर्यंत चालतच राहणार आहे. आजच्या रंगभूमी दिनानिमित्त हे कृतज्ञता पुष्प, हे रंगभूमी तुला आणि तुझे आराध्य दैवत नटरंगाला अर्पित करते.

              ।। आत्मविरोधी कुतूहलधरा

                  नमन नटवरा विस्मयकारा ।।

     

तुझीच रसिका, 

चैत्राली


- Chaitrali Tuljapurkar

Monday, March 25, 2024

प्रिय व.पु. यांस,


 प्रिय व.पु.,

हॅपी बर्थडे..

     गाणी ऐकत असताना एखादं गाणं अगदी अचानक हाताशी मिळावं आणि नंतर ते गाणं आपलं कायमचं  फेवरेट होऊन जावं,मला तुम्ही भेटलात अगदी तसे. म्हणजे मला व.पु. माहीतच नव्हते असेही नाही अगदी; पण रोज नजरेसमोर असणाऱ्या एखाद्या गोष्टीची खूप दुर्लक्षित बाजू कधीतरी नजरेत यावी आणि “ अरेच्चा..! हे आपल्याला आधी का नाही मिळालं..?”  असं वाटावं, माझ्यासोबत अगदी तसंच झालं. तुमच्या ‘बदली’ कथेमुळे मला तुम्ही माहीत होतात. कधीतरी काम करत असताना मी प्लेबॅकला तुमचा ‘जे के मालवणकरही’ ऐकला होता. त्यामुळे विनोदी कथाकार म्हणून तुमची ओळख झाली होती. मराठी वाचक म्हणून जितके व.पु.माहित हवे तेवढे मला माहित होतेच; पण मी तुमचा फॅन झालो ते म्हणजे तुम्ही 62 व्या नाट्य संमेलनात घेतलेली वसंतरावांची मुलाखत ऐकून. मराठी संगीत नाटकाची वैभवाची वाटचाल वसंतरावांनी फार ओघवत्या भाषेत अशी सांगितली की ऐकणाऱ्याने केवळ मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं. एखाद्या गोष्टीचा एवढा थोर व्यासंग करणाऱ्या सागरासारख्या थोर माणसाला एक मुलाखतकार म्हणून तुम्ही तेवढ्याच समृद्धतेने बोलतं केलं की समुद्रमंथन झाल्यासारखं वसंतरावांनी मराठी नाट्यसृष्टीची रंगभूमीची वैभवाची ती वर्षे अशी मौक्तिकांसारखी उलगडून दाखवली. वसंतरावांना ऐकून मी भारावलो होतोच; पण मी त्याहून भारावलो होतो तुमचा अभ्यास पाहून. तेव्हा जाणलं की, व.पु.म्हणजे कोणी सामान्य माणूस, साहित्यिक नाही. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा सगळे व.पु.वाचून काढायचे असं मनाशी ठरवलं. तो खयाल मनात तसाच राहिला आणि वेळ मात्र किनाऱ्याच्या वाळूसारखा भुरभुर उडून गेला आणि मनाशी ठरवलेलं तसंच राहिलं.

     काळ सरकत राहिला आणि मला सुलेखन करण्याची लहर आली. लिहू काय..? काय लिहू..? विचार करतानाच मीडियावर कुठेतरी वाचलं, ‘ अश्रू स्वतःची वकिली करतात. वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत.’  म्हटलं, “ कसलं भारीय हे..!” आणि खाली नाव पाहिलं तर तुमचं.मला काय आनंद झाला सांगू..? मला बऱ्याच मोठ्या काळाच्या खंडानंतर माझा हरवलेला दोस्त सापडला जणू. तेव्हापासून मी नियमित तुमचं लिखाण वाचत असतो आणि क्षणाक्षणाला आणखी वपुमय होत जातो. 

     खरं सांगू वपु..? ही माणसं तुम्हाला आपला ‘पार्टनर’ म्हणतात. म्हणजे त्यांनी तुमचे लिखाण तेवढे वाचले तर ते म्हणोत भले. मी मात्र तुम्हाला माझ्या जगण्याच्या महाभारतातला श्रीकृष्ण मानतो. तुम्ही ‘आपण सारे अर्जुन’ असे म्हणत असला तरीही..! कारण आपण सारे अर्जुन वाचत असताना तुम्ही मला सगळं काही त्या कृष्णाच्या ममतेनेच शिकवताय असा भास होतो. 

      माझी जात पडली लेखकाची. या जातीला जगण्यासाठी लागतात माणसं. मध्यमवर्गातली,उच्चभ्रू, नाल्या शेजारी पत्र्याच्या खोपटात राहणारी, पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मटण खाणारी, बस स्टँडवर काखेत पिशवी मारून उभी असणारी, नोकरीवर जाणारी,दरबारी कानडा ऐकत माना डोलवणारी, संध्याकाळी बागेतल्या बाकावर बसणारी अशी सगळी माणसं. आता एवढी माणसं बघत बसायची म्हणजे वेळ किती जायचा..? अशावेळी मी तुमचेच एखादं पुस्तक वाचतो किंवा चाळतो तरी म्हणजे अशा खूप माणसांपैकी कुणाचा तरी एखादा छोटासा पैलू सापडतो. ‘आपण सारे अर्जुन’ मध्ये तुम्हीच म्हणता की त्या 50 पुस्तकांमधून वेध घेतला फक्त माणसाचा. ते अगदी खरं आहे मला वाटतं. माणूस समजून घेण्यासाठी माणूसपणाच्या पलीकडे जावं लागतं आणि तुम्ही त्या स्थानी पोहोचलात. म्हणजे माणूस तुम्हाला समजलाय किंवा तुम्ही माणूस जाणलाय.

तुम्ही खूप थोर जगलात व.पु.आणि तसं थोर लिहिलंतंही. मलाही वाटतं की लिहावं खूप चांगलं. असंच माणसांवर.. पण लेखक म्हणून मला आत्ताच्या काळात एवढे मुक्त लिहायचं म्हटल्यास दोनदा विचार करावा लागतो. तुमचा काळ खरंच लेखकांसाठी किंवा कलाकारांसाठी सुखाचा म्हणावा असा. त्याकाळी माणूस जाणला जायचा केवळ त्याच्या कलेने आणि अंगभूत गुणांनी. आज मात्र माणसाला माणूस किंवा कलाकार म्हणून बघताना समाजाच्या किंवा रसिकांच्या नजरेवर चढतात वेगवेगळ्या विविध नजरांचे चष्मे. त्यातून माणसाची कला पाहिलीच जात नाही. कलाकार म्हणून आणखी काय सांगू व्यथा..? हो..! भावना..! ही आणखी एक नाजूक कण्याची बाई. कस्पटाच्या धक्क्यानेही दुखावणारी. एवढेच सांगा वपु.. आम्ही लिहिताना मुक्तपणानं लिहावं का नाही..? की सात आभाळ भेदत जाऊन, ब्रह्मांडाच्या गणितांशी खेळणाऱ्या आपल्या कलासक्त मनाच्या पाखराला घालायचा तथाकथित 'समाजजाणिवेचा' पिंजरा...? सांगा. हे एवढं निस्तरून लिहायला जमलं ना तर मीही होईन लोकांचा पार्टनर...

कळावे,

तुमचाच एक अर्जुन


- Darsh Samant 

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...