Monday, March 25, 2024

प्रिय व.पु. यांस,


 प्रिय व.पु.,

हॅपी बर्थडे..

     गाणी ऐकत असताना एखादं गाणं अगदी अचानक हाताशी मिळावं आणि नंतर ते गाणं आपलं कायमचं  फेवरेट होऊन जावं,मला तुम्ही भेटलात अगदी तसे. म्हणजे मला व.पु. माहीतच नव्हते असेही नाही अगदी; पण रोज नजरेसमोर असणाऱ्या एखाद्या गोष्टीची खूप दुर्लक्षित बाजू कधीतरी नजरेत यावी आणि “ अरेच्चा..! हे आपल्याला आधी का नाही मिळालं..?”  असं वाटावं, माझ्यासोबत अगदी तसंच झालं. तुमच्या ‘बदली’ कथेमुळे मला तुम्ही माहीत होतात. कधीतरी काम करत असताना मी प्लेबॅकला तुमचा ‘जे के मालवणकरही’ ऐकला होता. त्यामुळे विनोदी कथाकार म्हणून तुमची ओळख झाली होती. मराठी वाचक म्हणून जितके व.पु.माहित हवे तेवढे मला माहित होतेच; पण मी तुमचा फॅन झालो ते म्हणजे तुम्ही 62 व्या नाट्य संमेलनात घेतलेली वसंतरावांची मुलाखत ऐकून. मराठी संगीत नाटकाची वैभवाची वाटचाल वसंतरावांनी फार ओघवत्या भाषेत अशी सांगितली की ऐकणाऱ्याने केवळ मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं. एखाद्या गोष्टीचा एवढा थोर व्यासंग करणाऱ्या सागरासारख्या थोर माणसाला एक मुलाखतकार म्हणून तुम्ही तेवढ्याच समृद्धतेने बोलतं केलं की समुद्रमंथन झाल्यासारखं वसंतरावांनी मराठी नाट्यसृष्टीची रंगभूमीची वैभवाची ती वर्षे अशी मौक्तिकांसारखी उलगडून दाखवली. वसंतरावांना ऐकून मी भारावलो होतोच; पण मी त्याहून भारावलो होतो तुमचा अभ्यास पाहून. तेव्हा जाणलं की, व.पु.म्हणजे कोणी सामान्य माणूस, साहित्यिक नाही. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा सगळे व.पु.वाचून काढायचे असं मनाशी ठरवलं. तो खयाल मनात तसाच राहिला आणि वेळ मात्र किनाऱ्याच्या वाळूसारखा भुरभुर उडून गेला आणि मनाशी ठरवलेलं तसंच राहिलं.

     काळ सरकत राहिला आणि मला सुलेखन करण्याची लहर आली. लिहू काय..? काय लिहू..? विचार करतानाच मीडियावर कुठेतरी वाचलं, ‘ अश्रू स्वतःची वकिली करतात. वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत.’  म्हटलं, “ कसलं भारीय हे..!” आणि खाली नाव पाहिलं तर तुमचं.मला काय आनंद झाला सांगू..? मला बऱ्याच मोठ्या काळाच्या खंडानंतर माझा हरवलेला दोस्त सापडला जणू. तेव्हापासून मी नियमित तुमचं लिखाण वाचत असतो आणि क्षणाक्षणाला आणखी वपुमय होत जातो. 

     खरं सांगू वपु..? ही माणसं तुम्हाला आपला ‘पार्टनर’ म्हणतात. म्हणजे त्यांनी तुमचे लिखाण तेवढे वाचले तर ते म्हणोत भले. मी मात्र तुम्हाला माझ्या जगण्याच्या महाभारतातला श्रीकृष्ण मानतो. तुम्ही ‘आपण सारे अर्जुन’ असे म्हणत असला तरीही..! कारण आपण सारे अर्जुन वाचत असताना तुम्ही मला सगळं काही त्या कृष्णाच्या ममतेनेच शिकवताय असा भास होतो. 

      माझी जात पडली लेखकाची. या जातीला जगण्यासाठी लागतात माणसं. मध्यमवर्गातली,उच्चभ्रू, नाल्या शेजारी पत्र्याच्या खोपटात राहणारी, पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मटण खाणारी, बस स्टँडवर काखेत पिशवी मारून उभी असणारी, नोकरीवर जाणारी,दरबारी कानडा ऐकत माना डोलवणारी, संध्याकाळी बागेतल्या बाकावर बसणारी अशी सगळी माणसं. आता एवढी माणसं बघत बसायची म्हणजे वेळ किती जायचा..? अशावेळी मी तुमचेच एखादं पुस्तक वाचतो किंवा चाळतो तरी म्हणजे अशा खूप माणसांपैकी कुणाचा तरी एखादा छोटासा पैलू सापडतो. ‘आपण सारे अर्जुन’ मध्ये तुम्हीच म्हणता की त्या 50 पुस्तकांमधून वेध घेतला फक्त माणसाचा. ते अगदी खरं आहे मला वाटतं. माणूस समजून घेण्यासाठी माणूसपणाच्या पलीकडे जावं लागतं आणि तुम्ही त्या स्थानी पोहोचलात. म्हणजे माणूस तुम्हाला समजलाय किंवा तुम्ही माणूस जाणलाय.

तुम्ही खूप थोर जगलात व.पु.आणि तसं थोर लिहिलंतंही. मलाही वाटतं की लिहावं खूप चांगलं. असंच माणसांवर.. पण लेखक म्हणून मला आत्ताच्या काळात एवढे मुक्त लिहायचं म्हटल्यास दोनदा विचार करावा लागतो. तुमचा काळ खरंच लेखकांसाठी किंवा कलाकारांसाठी सुखाचा म्हणावा असा. त्याकाळी माणूस जाणला जायचा केवळ त्याच्या कलेने आणि अंगभूत गुणांनी. आज मात्र माणसाला माणूस किंवा कलाकार म्हणून बघताना समाजाच्या किंवा रसिकांच्या नजरेवर चढतात वेगवेगळ्या विविध नजरांचे चष्मे. त्यातून माणसाची कला पाहिलीच जात नाही. कलाकार म्हणून आणखी काय सांगू व्यथा..? हो..! भावना..! ही आणखी एक नाजूक कण्याची बाई. कस्पटाच्या धक्क्यानेही दुखावणारी. एवढेच सांगा वपु.. आम्ही लिहिताना मुक्तपणानं लिहावं का नाही..? की सात आभाळ भेदत जाऊन, ब्रह्मांडाच्या गणितांशी खेळणाऱ्या आपल्या कलासक्त मनाच्या पाखराला घालायचा तथाकथित 'समाजजाणिवेचा' पिंजरा...? सांगा. हे एवढं निस्तरून लिहायला जमलं ना तर मीही होईन लोकांचा पार्टनर...

कळावे,

तुमचाच एक अर्जुन


- Darsh Samant 

No comments:

Post a Comment

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...