Tuesday, September 15, 2026

And Then There Was Her: The Queen of Crime

 


Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latter’s made-up tales fueled her imagination, ultimately earning her the title of the ‘Queen of Crime’. Amusing herself, little Agatha loved making up imaginary friends, playing with animals, and writing poems. Author and family friend Eden Philpotts often remarked on Agatha’s mother’s aversion to the girl’s writing and poetic whims by saying, “The artist is only the glass through which we see nature, and the clearer and more absolutely pure that glass, so much the more perfect picture we can see through it. Never intrude yourself.”

She loved travelling, and often found herself a visitor of many cities, from living in the French capital to the archaeologically affluent city of Cairo. As she grew more in love with her husband, Archie Christie, she also had to face long years of loneliness while he was away at war, fighting for the Allied powers. The atrocities of the First World War affected both spouses. Archie, posted in France, and Agatha, on the Home Front, each played their part in the war, with Agatha working as a nurse with the Voluntary Aid Detachment in a Red Cross Hospital in Torquay.

Agatha Christie is a household name today among the all-time bestselling authors in the world, courtesy of the Belgian, methodical detective with the waxed moustache, Hercule Poirot. Known for his wit and keen understanding of the real world, Poirot’s character was inspired by a Belgian refugee and former great policeman who had settled in Torquay. As for the murder method in her novels, she naturally settled on poison, putting her knowledge and experience of the dispensary to use.

According to UNESCO’s Index Translationum, she remains the most-translated individual author and was also voted the best crime writer, while The Murder of Roger Ackroyd was voted the best crime novel ever by 600 professional novelists of the Crime Writers’ Association. Following the war, Agatha continuously experimented with different kinds of mystery and thriller novels. Her well-renowned novel that lifted her to fame was the debut novel featuring Hercule Poirot, The Mysterious Affair at Styles.

Towards the end of 1927, Agatha had created another intriguing amateur detective—a white-haired old lady from a seemingly sheltered village named Miss Jane Marple. 

Her mother’s death and her inevitable divorce in 1928 brought a significantly dark turn in her career. This marked the moment when, writing was no longer pleasure but a profession.

Alongside writing novels, Agatha also began to take an interest in playwriting ; following the disappointing adaptation of The Murder of Roger Ackroyd into 'Alibi' by Michael Morton in 1928. In 1930, she wrote a brand-new play featuring Poirot, Black Coffee, after which she decided to remove Poirot from future stage productions, arguing that he took attention away from the plot. In 1947, Agatha was approached by the BBC to write a radio play for the 80th birthday of Queen Mary, who was an avid admirer of her work. The result was Three Blind Mice, which ultimately became The Mousetrap, the longest-running play in history.

Agatha’s writings were gaining critical popularity. In 1948, Penguin published 100,000 copies of ten of her novels; then, in 1950, Collins printed 50,000 copies of her 50th book, A Murder Is Announced. Her works are consequential proofs of the phenomenal events of her life. 

From being a young girl immersed in creativity to rightfully becoming the ‘Queen of Crime’, who imprinted her creative soul on the pages of more than a hundred literary works.

Agatha Mary Clarissa Christie, along with her merited fame, has also earned an evergreen place in the hearts of those of us who are mystery and crime-fiction enthusiasts through her extraordinary skill in weaving some of the most sophisticated yet gripping thriller tapestries of all time. As we celebrate her 136th birth anniversary, her stories remind us that great mysteries may be solved, but the fascination of her world of secrets, suspense, and human nature never truly ends.


-Krutika Mali

Friday, August 28, 2026

स्व. प्रा. यास्मिन शेख : मराठी भाषेच्या भाषायोगिनी


 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा प्राण आहे. पण या भाषेचे व्याकरण, तिचे शुद्धलेखन आणि तिची नेमकी रचना अभ्यासपूर्णरीत्या जपण्याचे काम काही मोजक्याच विदुषींनी केले. त्यातलेच एक आदराचे नाव म्हणजे ‘भाषायोगिनी’ प्रा. यास्मिन शेख. संपूर्ण आयुष्य मराठी भाषेची अखंड सेवा करून २४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोण होत्या त्या...? तर एक अत्यंत आदराचे आणि प्रगल्भ नाव म्हणजे प्रा. यास्मिन शेख.

ज्यू पार्श्वभूमीतून येऊनही मराठी भाषेवर अगाध प्रेम करणारी आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा पोत लिलया समजून सांगणारी ही व्यक्ती म्हणजे मराठी भाषेची एक निष्ठावान ‘साधक’ होती. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा एक मागोवा...

प्रा. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘जेरुषा रुबेन’ असे होते. १९५० मध्ये त्यांचा विवाह अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. वैवाहिक आयुष्यासोबतच त्यांनी आपली शिक्षणाची आणि साहित्याची आवड जोपासली.

यास्मिन शेख या पुण्याच्या प्रतिष्ठित सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. येथून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. श्री. म. माटे हे त्यांचे गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा यास्मिन शेख यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केवळ नोकरी न करता, आयुष्यभरासाठी ज्ञानदानाचे तप स्वीकारले. तब्बल ३४ वर्षे त्यांनी अनेक पिढ्यांना मराठी भाषा शिकवली. मुंबईच्या गजबजाटातही मराठीचा दीप तेवत ठेवणाऱ्या एसआयईएस (SIES) महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी सहा वर्षे त्यांनी केवळ जबाबदारी सांभाळली नाही, तर मातृत्वाच्या भावनेने तो विभाग जोपासला. त्यानंतर SIAC, मुंबई येथे तब्बल दहा वर्षे त्यांनी देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या प्रशासकी अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणांच्या जिभेवर व्याकरणासोबतच मराठी अस्मितेचे संस्कार कोरले.

प्रा. यास्मिन शेख यांचे योगदान फळ्यापुरते कधीच मर्यादित नव्हते. त्या केवळ वर्गात शिकवत नव्हत्या, तर महाराष्ट्राच्या मनात मराठीचे बीज रुजवत होत्या.

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तक समितीत सात वर्षे त्यांनी जे शब्द पेरले, त्यातून आज लाखो मुलांच्या मनात मराठी रुजत आहे. ‘कार्यात्मक व्याकरण’ हे पुस्तकी ओझे न राहता मुलांच्या जगण्याचा भाग व्हावे, यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या १५ वर्षांच्या वाटचालीत त्यांनी केवळ सल्लागार म्हणून नव्हे, तर मासिकाचा भाषिक आत्मा म्हणून कार्य केले. ‘लोकसत्ता’च्या ‘भाषासूत्र’मधून अनोळखी वाचकांच्या एका छोट्याशा शंकेचेही त्यांनी कधी उत्तर टाळले नाही; अत्यंत आपलेपणाने प्रत्येक शंकेचे निरसन केले.

“बोली ही मायेची ऊब आहे, पण प्रमाण भाषा ही आपल्या संस्कृतीचा कणा आहे. वाङ्मयात तो कणा ताठच हवा,” हा त्यांचा आग्रह हट्ट नव्हता, तर आपल्या भाषेवर असलेले आईसारखे प्रेम होते. त्यांच्यासाठी भाषा हे केवळ माध्यम नव्हते, तर तो त्यांचा श्वास होता; अस्मिता होती; अस्तित्व होते.

आणि म्हणूनच, या तपस्वी वाटचालीसाठी मिळालेले पुरस्कार हे केवळ सन्मान नाहीत, तर महाराष्ट्राने आपल्या या लेकीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे.

वयाच्या १०१ व्या वर्षी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांनी जरी जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांनी मागे ठेवलेले भाषेचे भांडार, शब्दलेखनकोश आणि त्यांच्याकडून शिकलेल्या पिढ्यांच्या रूपाने त्यांचे कार्य सदैव अमर राहील. मराठी भाषेवर इतके अगाध प्रेम करणारी आणि तिची आयुष्यभर सेवा करणारी ही ‘भाषायोगिनी’ मराठी माणसाच्या स्मृतीत नेहमीच दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल.

पुन्हा एकदा स्व. प्रा. यास्मिन शेख यांच्या चरणी विनम्र अभिवादन...!!


- कु. पूर्वा शिवप्रसाद काणे


Sunday, August 9, 2026

रंगभूमीच्या पहाटेचे किमयागार: विष्णुदास भावे

 




आपले स्वप्न, रंगभूमीवर साकार करण्याची जिद्द बाळगतो; तो एक किमयागार! एक मोठे ध्येय रंगीत पडद्यावर साकार होण्याच्या आधी ते रुजले जाते त्या किमयागाराच्या स्वप्नात, मनात आणि विचारात. अशाच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणारे आणि मराठी नाट्यसृष्टीला व्यावसायिक स्तरावर नेऊन ठेवणारे मराठी रंगभूमीचे जनक म्हणजेच विष्णुदास अमृत भावे.

१८० वर्षांहून अधिक काळ मराठी नाटकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला नाट्यवेडा करणारा हा प्रवास सुरू झाला; जेव्हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या 'भावे वाडा' येथे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारात कार्यरत असणारे अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी बहिणाबाई फडके यांच्या घरी ९ ऑगस्ट १८१८ रोजी एक कलाप्रेमी अवलिया जन्माला आला. ज्याचं नाव होतं विष्णुदास!

सांगलीतील हे भावे घराणं विद्वानांनी समृद्ध होतं. विष्णुदासांचे वडील व ज्येष्ठ बंधू हे पटवर्धन रावांच्या दरबारात कार्यरत होते. तर, त्यांची आई एक उत्तम आयुर्वेदतज्ज्ञ होती. विष्णुदास भावे हे देखील अतिशय बुद्धिमान आणि विचारी होते. घरी शिस्तबद्ध आणि विचारशील वातावरण असूनही त्यांचे मन कला आणि सर्जनशील विचारात रममाण होत असे.

बाल्यावस्थेपासूनच त्यांना संगीत, अभिनय, लोककला यांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घ्यायची असोशी होती. लहानपणी बाहुल्यांसोबत खेळण्याच्या वयात, त्यांना स्वतः लाकडी बाहुल्या बनवण्याचा नाद होता. लाकडाला ठोकून आकार देण्यापासून, ते त्याच्यावर रेखीव नक्षीकाम करण्यापर्यंत ते त्यात तल्लीन होऊन जात. याच लाकडी बाहुल्या बनवताना त्यांनी एक स्वप्न पाहिले. ते स्वप्न म्हणजे याच लाकडी बाहुल्यांना घेऊन सीता स्वयंवराचा खेळ करायचं. इतक्या लहान वयात सजीव कलाकारांशिवाय, निर्जीव बाहुल्यांमध्ये जीव फुंकून एक कलाकृती उभारण्याचं हे अभूतपूर्व स्वप्न. कोवळ्या वयात त्यांच्यात दडलेल्या सदृश दिग्दर्शकाची एक झलकच होती!

विष्णुदासांच्या या कल्पनेला कलाटणी मिळाली ती चिंतामणराव पटवर्धनांनी दिलेल्या एका आदेशावरून. १८४२ - ४३ साली कर्नाटकातील सुप्रसिद्ध 'भागवत नाटक मंडळी' सांगली येथे आली होती. त्यांच्या नाटकाचे प्रयोग राजांना रंजक वाटले. आपल्या दरबारात कार्यरत असणाऱ्या अमृतराव भावेंचे सुपुत्र विष्णुदास भावे यांचे नाट्यवेड पाहता, पटवर्धन राजेसाहेबांनी या नाट्यप्रेमाला प्रोत्साहन द्यायचे ठरवले आणि असाच एक नाट्यप्रयोग मराठीतून सादर करण्याची आज्ञा दिली. विष्णुदास भावेंसाठी ही संधी जणू पर्वणीच होती!

अशाप्रकारे १८४३ साली अनेक कलाकारांच्या सहाय्याने 'सांगलीकर' नाटक मंडळी' ची स्थापना करण्यात आली. या नाट्यमंडळी अंतर्गत विष्णुदास भावेंनी मराठी रंगभूमीवर १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले - वहिले मराठी नाटक सादर केले; ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले. या प्रयोगासाठी लागणारे अर्थसहाय्य चिंतामणराव पटवर्धनांकडून लाभले. परंतु, १८५१ साली चिंतामणरावांचे निधन झाले आणि राजवाड्यातून येणारी आर्थिक मदत स्थगित झाली.

भाव्यांवर अवकळा पसरली; असे असले तरीही त्यांनी माघार घेतली नाही. उलट, याला आव्हान म्हणून सामोरे जात दुप्पट जिद्दीने नाट्यसृष्टीचा विस्तार करायचे ठरवले.

अर्थासहाय्यासाठी भावे मुंबईत आले. आणि १८५३ साली त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध ग्रँड रोड थिएटर येथे रीतसर तिकीट लावून राजा गोपीचंद और जालंदर या पहिल्या व्यावसायिक हिंदी नाटकाचा प्रयोग केला. अशा तर्‍हेने त्यांनी फक्त मराठी नव्हे, तर हिंदी नाट्यसृष्टीलाही समृद्ध केलं. या नाट्यप्रयोगामुळे लोकं रंगभूमीकडे वळायला लागले. सीता स्वयंवर नंतर त्यांनी 'इंद्रजीत वध', 'दशरथ विवाह', 'नृसिंह अवतार'; अशी अनेक दिग्गज नाटकं रंगमंचावर आणली आणि ही देखील तुफान गाजली. त्यांची नाटकं इतकी गाजण्याचं प्रमुख कारण कदाचित त्यांची नाविन्यपूर्ण धाटणी, संगीताचा सुरेख वापर आणि जिव्हाळ्याच्या विषयांची निवड हे असावं.

भावेंची नाटकं ही गद्य आणि पद्य स्वरूपात असायची. सूत्रधाराकडून मंगलाचरण, वनचरी वेश असलेला विदूषक, गणेशस्तवन, सरस्वती स्तवन आणि नाट्यारंभ या स्वरूपात त्यांच्या नाटकांची आखणी असायची. लहानपणी त्यांना असलेली संगीताची आवड त्यांनी नाटक लिहिताना जोपासली आणि नाटकाला थोडेसे पद्याचे स्वरूपही दिले. आजही अनेक नाटककार विष्णुदासी नाटकांचा साचा आणि पदे यांचे अनुकरण करत नाटकं प्रस्तुत करतात.

केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी नाट्यसृष्टीला ही लाभलेल्या त्यांच्या या योगदानामुळे त्यांना मराठी नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून संबोधण्यात येते व त्यांच्या स्मरणार्थ आजही जाणकार व अभ्यासू रंगकर्मींना विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविण्यात येते.

-आर्यन पाध्ये

Wednesday, July 15, 2026

कवी कालिदास : चिरंतन साहित्याप्रवाह

 


"आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥"

आषाढाचा पहिला दिवस. नभात काळेभोर मेघ दाटून आले आहेत. डोंगर-शिखरांना बिलगून बसलेले ते मेघ जणू एखाद्या खेळकर हत्तीने पर्वताला कवेत घेतल्याचा भास निर्माण करतात. विरहाने व्याकूळ झालेला यक्ष त्या मेघाकडे पाहतो आणि त्याच्या मनात आशेची एक नवी पालवी फुटते. तो त्या मेघालाच आपल्या प्रेयसीचा दूत बनवतो. केवळ दोन ओळी... पण डोळ्यांसमोर उभं राहतं एक जिवंत चित्र!

हीच महाकवी कालिदासांची जादू. ते फक्त निसर्गाचं वर्णन करत नाहीत, तर ते निसर्गाला बोलतं करतात. ते फक्त उपमा देत नाहीत, तर उपमांनाच अमरत्व देतात. त्यांच्या शब्दांतून ऋतू जिवंत होतात, पर्वत श्वास घेतात, नद्या गातात आणि मेघही दूत बनतात. म्हणूनच संस्कृत साहित्यातील प्रत्येक रसिकाच्या मनात कालिदासांचं स्थान आजही अढळ आहे.

याच कारणामुळे आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस केवळ पावसाच्या आगमनाचा नाही; तर तो भारतीय साहित्यविश्वातील या अमर प्रतिभेला अभिवादन करण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो.

कालिदासांच्या जीवनाची कथा म्हणजे अंधाराकडून तेजाकडे झालेला प्रवास. त्यांच्या जन्मकाळाबद्दल इतिहासकारांची वेगवेगळी मतं असली, तरी त्यांच्या प्रतिभेच्या तेजावर कोणाचाही मतभेद नाही. आख्यायिकेनुसार, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यामुळे एका गवळ्याने त्यांचं पालनपोषण केलं. शिक्षणाची संधी न मिळाल्याने ते अशिक्षित राहिले. समाज त्यांच्याकडे बुद्धिहीन तरुण म्हणून पाहत होता. पण कधी कधी नियती आपल्या महान कलाकृतीची सुरुवात अगदी साध्या रेषेपासून करते. कालिदासांचं आयुष्यही असंच घडत गेलं.

कालिदासांचं साहित्य वाचताना जाणवतं की, ते केवळ कवी नव्हते; ते मानवी भावनांचे सूक्ष्म निरीक्षक होते. प्रेम, विरह, आनंद, करुणा, आशा, ऋतूंचे बदल, निसर्गाची लय या सगळ्यांना त्यांनी शब्दांत असं गुंफलं की, प्रत्येक वाचकाला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्यांच्या लेखनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे चित्रमयता. वाचकाला एखादा श्लोक वाचताना तो केवळ वाचल्यासारखा नाही, तर अनुभवल्यासारखा वाटतो.

त्यांच्या उपमा इतक्या प्रभावी आहेत की, संस्कृत साहित्यात आजही एक म्हण प्रचलित आहे, "उपमा कालिदासस्य", म्हणजेच उपमेचा विषय निघाला की, कालिदासांचीच आठवण होते.

त्यांच्या लेखणीतून हिमालय हा केवळ पर्वत राहत नाही; तर तो पृथ्वीचा मुकुट बनतो. मेघ हा फक्त पावसाळी ढग राहत नाही; तर विरही हृदयाचा सखा बनतो. शकुंतला ही केवळ नायिका राहत नाही; तर निरागस प्रेमाचं प्रतीक बनते. यामुळेच त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.

अभिज्ञानशाकुन्तलम् या नाटकाने युरोपातील विद्वानांनाही मंत्रमुग्ध केलं. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आणि जगभरातील साहित्यप्रेमींनी कालिदासांच्या प्रतिभेला वंदन केलं.

आजही कालिदासांचं साहित्य वाचताना आश्चर्य वाटतं. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आजही इतके ताजे कसे वाटतात? याचं उत्तर त्यांच्या शैलीत दडलेलं आहे. त्यांनी निसर्गाला मानवी भावना दिल्या आणि मानवी भावनांना निसर्गाचं सौंदर्य. त्यामुळे त्यांच्या कविता केवळ वाचल्या जात नाहीत, तर त्या जगल्या जातात. म्हणूनच त्यांना 'उपमा सम्राट', 'कविकुलगुरू' अशा उपाधींनी गौरवण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश शासनाचा 'कालिदास सन्मान' हा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आजही दिला जातो.

आषाढातील पहिला मेघ जेव्हा आकाशात दाटून येतो, तेव्हा तो फक्त पावसाची चाहूल देत नाही; तर तो आपल्याला आठवण करून देतो त्या कवीची, ज्याने मेघालाच दूत बनवलं, ऋतूंना कविता बनवलं आणि शब्दांना चिरंतन सौंदर्य बहाल केलं. महाकवी कालिदास, ज्यांनी संस्कृत साहित्याला केवळ समृद्ध केलं नाही, तर वाचकांना जगाकडे पाहण्याची एक नवी, अधिक सुंदर दृष्टी दिली.

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि कालिदास दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


- वेदिका काण्णव 

Sunday, June 14, 2026

११० वर्षे, विचारांना व्यासपीठ देत


 प्रिय वादसभा,

सप्रेम नमस्कार.

पत्रास कारण की, १९१६ पासून ते आजपर्यंत, "वादसभा" ही केवळ एक संस्था नाही तर एक वारसा आहे. अनेक विद्यार्थी आले, अनेक विचारधारा आल्या तरी तुझ्यातला नवखेपणा आणि तरीही सोबत असलेली परंपरा, तू कायम जपत आली आहेस. आजकालच्या जगात "तुम्ही कसे टिकून आहात" हा प्रश्न नेहमी केला जातो, पण तू तितक्याच जोमाने टिकूनच नाही तर सक्रिय सुद्धा आहेस. वादसभा ही कायमच प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी कार्यरत ठेवलेली संस्था आहे. इथल्या सर्व प्रमुख कार्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, त्यामुळे तू एक संस्था म्हणून निराळी आणि विद्यार्थ्यांना आकर्षक अशी आहेस. अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून ते आत्ताच्या नव्या शतकापर्यंत, तू सर्वांना सामावून घेऊन सर्व सदस्यांना माळेतल्या मोत्यांप्रमाणे एकमेकांशी जोडतेस.

इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन सदस्याला असंच वाटतं की आपल्यातल्या काही कौशल्यांना इथे वाव मिळेल. पण तेवढेच नसून, तू प्रत्येक सदस्य हा माणूस म्हणून घडवतेस. इथे आम्ही स्पर्धा, कार्यक्रम, कार्यशाळा हे सगळं अनुभवतो.

एखादी नदी ही प्रवाही असेल तरच ती मातीला अधिक सुपीक बनवते. तसंच तू प्रत्येक सदस्याला तुझ्यासारखेच प्रवाही रहायला शिकवतेस. सतत काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याच्या प्रेरणेमुळे आम्ही सर्व सदस्य आमच्याच भोवती आखलेलं रिंगण मोडून आकाशात झेप घेऊ शकतो. आणि असं काही करण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी अनेक हात पुढे येतात ते तुझ्याच आजी आणि माजी सदस्यांचे. अगदी प्रोत्साहन देण्यापासून ते अपयशी झाल्यावर आधार देणारे, आणि आपल्यासाठी खणखणीत टाळ्या वाजवण्यापर्यंत सगळेच एकमेकांना सामावून घेतात. इथे बक्षीस मिळवणं महत्त्वाचं नसून सहभाग घेणं आणि काहीतरी नवीन करत राहणं, ह्यातच कौतुकाची एक थाप मिळते.

परंतु तू जशी कोमलपणे आपल्या सदस्यांना सांभाळून घेतेस तसंच वेळ पडल्यावर त्यांना जबाबदारीची जाणीव ही करून देतेस. आपल्यावर असलेला विश्वास, जबाबदारी ही फार महत्वाची गोष्ट असते ह्याची जाणीव आम्हा सर्वांना वेळोवेळी करून देतेस. त्याचबरोबर आपली जबाबदारी पार पडली की इतरांना मदत करण्याचे गुण तूच आमच्यात पेरले आहेत. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेकांचे अमूल्य योगदान असते, तेव्हा प्रत्येक छोटे-मोठे काम ह्याला महत्त्व देण्याचा धडा आम्हाला मिळतो. Canva, एडिटिंग, social media सारख्या कार्यशाळांमधून आम्ही जगासाठीही तयार होतो.

कै. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असते. ही स्पर्धा दोन दिवसांसाठी भरत असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची तयारी असते. स्पर्धेचे विषय हे आम्ही सदस्यच ठरवतो हे ऐकून मला आधी तर विश्वास बसला नव्हता. परंतु ती संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कठीण आणि विचारांना चालना देणारी असते.

आज आम्ही जगाशी एकरूप होऊन आपल्या अवतीभोवती काय चालले आहे हे उघडपणे बघू शकतो, तसेच त्यावर आपले मत मांडू शकतो. एखाद्या विषयावर आपले मत घडवणे आणि ते मांडणे किती अवघड असते ह्याचे प्रात्यक्षिक आम्हाला तुझ्यामुळे कळते. परंतु तरीही मत मांडण्याचा आणि समोरच्याचे मत ऐकून त्याचा आदर करण्याचा मूलभूत भाव आमच्यात वेळोवेळी रुजवलास. ह्या शिकवणींमुळे तू आमच्या सर्वांमधला माणूस निर्माण करण्याचं काम अगदी चोख करत आली आहेस.

दरवर्षी तुझ्या प्रांगणात अनेक विद्यार्थी येतात आणि सोबत अनेक गोष्टींचं गाठोडे घेत निरोप घेतात. आम्हा सर्व सदस्यांना तू एका वटवृक्षासारखी सावली देतेस. आम्हाला एक टीम म्हणून एकमेकांचा आदर करायला, सामावून घ्यायला, एकमेकांना मदत करायला, तेवढ्याच हक्काने मदत मागायला, आणि सर्वांना घेऊन पुढे जाणे हे आम्हाला शिकवलेस. त्यामुळे आम्हाला लाभलेली टीम ही फक्त टीम न उरता एक कुटुंब बनते.

मला वाटते की तू एक संस्था म्हणून तुझ्या प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारण्याचे धैर्य, सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा आणि मतभिन्नतेचा आदर करायला शिकवतेस. ह्याच तिन्हीमधून "वाद" जन्माला येतो. परंतु "वादे वादे जायते तत्त्वबोधः" ह्या तुझ्या ब्रीदवाक्यातून हेही शिकवतेस की ह्या वादातले तत्व नाहीसे झाले की तो वाद परिपूर्ण राहत नाही. कदाचित म्हणूनच आजही तू चिरंतन टिकून आहेस, कारण वादसभा माणसाच्या विचारस्वातंत्र्याला, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला आणि संवादाच्या संस्कृतीला सतत बळ देते आणि हाच तुझ्या कालातीत अस्तित्वाचा खरा पाया आहे. ह्यामुळेच आम्ही सर्व तुझ्याप्रती, तू दिलेल्या संस्कारांप्रती, कायम कृतज्ञ आहोत.

वादसभेचे हे वटवृक्ष असेच बहरत राहो हीच आम्हा सर्वांची इच्छा.

तुझीच सदस्या,

चैत्राली तुळजापुरकर

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...