Tuesday, February 27, 2024

माझी मराठी

माझी मराठी

माझी भाषा माझी आई 
अर्थ भावनांना देई l 
तिच्या राहावे ऋणात
होऊ नये उतराई ll 

     फक्त मराठी नाही! तर जी आपली मातृभाषा आहे अशी मराठी भाषा ! "संस्कृत" जी पूर्वी देवभाषा होती, अशा संस्कृत नंतर जिचा जन्म झाला ती म्हणजे प्राकृत; माझी मराठी भाषा! आज उपलब्ध असलेले मराठी भाषेतील पहिले वाक्य म्हणजे "श्री चामुण्डराये करवियले." हे वाक्य म्हैसूर जवळ श्रवण - बेळगोळ येथील शिलालेखात आपल्याला आढळून येते. हा लेख इ. स. शके ९८३ म्हणजे ज्ञानेश्वरीपूर्वी ३०७ वर्षी कोरला गेला .
     मराठी भाषेच्या साहित्य परंपरेचा विचार केला जातो त्या वेळी बघणाऱ्याचे डोळे, ऐकणाऱ्याचे कान, घेणाऱ्याचे हात कमी पडतात; कारण अत्युच्च साहित्य परंपरा लाभलेली माझी मराठी सढळ हाताने जो तिचे लेणे लेऊ इच्छितो त्याच्याकडे येते.
     संपूर्ण मराठी भाषेत लिहिला गेलेला सर्वात प्रारंभी चा ग्रंथ म्हणजे "विवेकसिंधू." हा ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज मराठीचे आद्यग्रंथकार ठरतात. संपूर्ण मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ इ. स. ११८८ मध्ये त्यांनी लिहिला. 
     मराठी भाषा एक अशी भाषा आहे l जी अत्यंत लवचिक आहे. "वळवावी तशी वळते ती माझी मराठी भाषा..!" असं म्हणताना मन अभिमानाने भरून येतं. आज कोणत्याच भाषेची असणार नाहीत इतकी रूपे मराठीची पाहायला मिळतात. तिचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक ठिकाणी ती त्या त्या लोकांची होऊन जाते. 
   खेड्या पाड्यातील रांगडी , अशुद्ध , अपभ्रंश असलेली भाषा असो, कोल्हापुरी ठसक्यात बोलली जाते ती मराठी असो, किंवा मालवणी / कोकणी अशा गोड स्वरात बोलली जाते ती मराठी असो शेवटी असते ती आपली मराठीच! आपली मराठी इतकी श्रेष्ठ आहे की तिची रूपे जरी वेगवेगळी असली ना, तरी एकमेकांच्या मनातील भावना पोहोचवण्याचं काम आपली मराठी करत राहते. 
   पूर्वी मराठी भाषेला राजभाषेचा मान प्राप्त नव्हता पण तो आज काही प्रमाणात मिळाला आहे. इतकंच नाही तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये मातृस्थानी, मायबोली, मातृभाषा म्हणून माझी मराठी स्थित आहे. कारण आईची भाषाच वेगळी असते. कधी ती नजरेतून बोलते, कधी बोलण्यातून तर कधी स्पर्शातून व्यक्त होते. म्हणूनच तर तिला मातृभाषा म्हणतात! जी पोटातून येते ती मातृभाषा, कळवळ्याची भाषा; आणि जी ओठातून येते ती व्यावहारिक भाषा! 
      आपल्या संस्कृतीमध्ये, इतिहासामध्ये जे संतमहात्मे होऊन गेले त्या सर्वांनी देखील मातृस्वरूप मराठीची अत्यंत मनोभावे सेवा केली आहे. ज्ञानोबा माऊली आपल्या मराठी भाषेचा गौरव करताना लिहितात, 
माझ्या मराठीचीया बोलू कवतुके l परी अमृता तेंही पैजा जिंके l ऐशीं अक्षरें रसिकें l मेळवीन ll
माझी मराठी भाषा इतकी श्रेष्ठ आहे की तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गोडीच्या बाबतीत माझी मराठी "अमृताला" पैजेवर, प्रतिज्ञेवर जिंकू शकते. अशा तऱ्हेची रस, अलंकारयुक्त अमृतमधुर शब्दांची रचना केवळ मराठीत करता येते. अशी आपली मराठी!
       असं सगळं असताना आज आपल्या मराठी भाषेची होत असलेली गळचेपी आपण शांतपणे पाहणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आजच्या काळात अगदी "शिक्षण" क्षेत्रातही मराठी भाषेला मानाचे स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय! खरंतर पूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांनीही सांगितलंय की ज्ञान मिळण्यासाठी आपली मातृभाषाच उत्तम! परंतु हे आपल्याला समजणार केव्हा? 
मराठी भाषेची गळचेपी थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी तरच आपल्याला अधिकार आहे," लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " म्हणण्याचा! यासाठी इतर भाषांचा राग, अपमान करण्याची गरज नाही. फक्त आपल्या मातृभाषेचा, मायबोलीचा, मराठी भाषेचा विसर कधीही पडून देऊ नका. आपली भाषा सामर्थ्यवान आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. तेव्हाच आपण अभिमानाने सांगू की ही मातृभाषा माझी मराठी आहे !!! 
शेवटी फक्त इतकेच ,
माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले 
तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले ll 
धन्यवाद !!
 - वादसभा सदस्य पूर्वा शिवप्रसाद काणे

No comments:

Post a Comment

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...