ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.
सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं!
"कोंडलेल्या वादळांच्या
ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या
येथूनी निघतील वाटा...!"
विनम्र अभिवादन.
-आर्य सोनवणे
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाच्या निवडक पैलूंचा वेचक वेध. खूपच मांडणी.Keep it uo!
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख.. बाबा आमटे यांचे जीवन कार्य अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे. आर्य बेटा तुझे खूप खूप अभिनंदन.. लिहित रहा..
ReplyDelete