Saturday, February 8, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

2 comments:

  1. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाच्या निवडक पैलूंचा वेचक वेध. खूपच मांडणी.Keep it uo!

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख.. बाबा आमटे यांचे जीवन कार्य अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे. आर्य बेटा तुझे खूप खूप अभिनंदन.. लिहित रहा..

    ReplyDelete

जागतिक महिला दिन!

हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही ...