Thursday, October 31, 2024

राष्ट्रीय एकता दिवस


एक काठी असेल तर ती सहज मोडता येते; परंतु काठ्यांचा गठ्ठा तितक्‍या सहजतेने मोडता येत नाही. लहानपणापासूनच अशा छोट्या गोष्टींतून आपल्यात एकीचे बळ खोलवर रुजवले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच एकीच्या बळाचा वापर करून भारतातील विविध संस्थानांना एकत्र केले आणि जणू एका शिल्पकाराप्रमाणे भारताला नव्या रूपात घडवले. सरदार वल्लभभाई पटेल (भारताचे लोहपुरुष) यांनी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी विभाजन संपवून भारताला एकसंध राष्ट्र बनवण्यास मदत केली. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा त्याच्या विविधतेतून निर्माण झाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने या विविधतेचे परिवर्तन विषमतेत नव्हे, तर एकतेत करण्याचा ध्यास वल्लभभाईंनी उरी बाळगला, आणि समर्थपणे या विविधतेतून राष्ट्रात एकता निर्माण केली. आपल्यामधील भाषिक, पारंपरिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विविधतेत बंधुत्वाची भावना टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो.


आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका देखील याच मूल्यांची पायाभरणी करते आणि लोकांमध्ये निर्धार, समानता, आणि विश्वास या तत्त्वांचा पाया घालते. भारताचे नागरिक म्हणून या मूल्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या मनात स्वतःच्या संस्कृतीचा गर्व असलाच पाहिजे; परंतु त्याचबरोबर दुसऱ्याच्या संस्कृतीचा आदर आणि सन्मान बाळगण्याची भावना हवी. मात्र, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत असताना आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे – आजच्या काळात एकता या संकल्पनेचा अर्थ काहीसा बदलला आहे का? एकता साजरी करत असताना, ती खऱ्या अर्थाने अंमलात येत आहे का, की केवळ प्रतीके उरली आहेत? विविधतेतून एकता साधण्याचा उद्देश जोपासण्यासाठी आज आपल्या समाजात समजूतदारपणा, सहिष्णुता, आणि सर्वांचा समान आदर वाढवण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हेच खरे तर राष्ट्रीय एकात्मतेची खरी परीक्षा आहे.


-आर्यन पाध्ये

No comments:

Post a Comment

A Mindful Step Towards Shared Mindfulness

  Closing our eyes and taking a deep breath seems like a very simple activity to do, but it has a deeper connection to the mind and soul tha...