Tuesday, November 19, 2024

मतदानाचा हक्क, तुमची ताकद!


लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालणारे सरकार. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क फक्त एक अधिकार नाही, तर एक जबाबदारी आहे, जी आपल्या देशाच्या भवितव्याला आकार देते. सरकारी निर्णयांवर व्यक्ती प्रभाव टाकू शकतील, अशा सर्वांत महत्त्वाच्या मार्गांपैकी एक म्हणजे मतदान. मतदान म्हणजे कार्यालयासाठी किंवा एखाद्या समस्येच्या प्रस्तावित निराकरणासाठी उमेदवाराची पसंती व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग. मतदान प्रामुख्याने राष्ट्रीय किंवा प्रादेशिक निवडणुकीसाठी होते; मात्र स्थानिक व लहान सामुदायिक निवडणुकाही सरकारमधील वैयक्तिक सहभागासाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. संविधानातील सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. या अधिकारामुळे साधा सामान्य माणूस असो वा श्रीमंत, उच्चशिक्षित असो किंवा अशिक्षित, प्रत्येकाला मत देण्याचा समान अधिकार प्राप्त झाला. याच अधिकारामुळे आपल्या देशातील लोकशाहीचे मूळ मजबूत झाले. पंतप्रधानांपासून सरपंचांपर्यंतच्या निवडीचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. यामुळेच न्याय व हक्कांची जाणीव होऊ लागली आणि स्वातंत्र्याची खरी अनुभूती मिळाली.

आज भारताची लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही मानली जाते, याचे मुख्य कारण म्हणजे तिची प्रभावी निवडणूक प्रक्रिया. दर पाच वर्षांनी निवडणूक होत असल्याने प्रत्येक नागरिकाला आपल्या मतांच्या ताकदीची जाणीव होते. संविधानाने दिलेले समानता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्याचे सामर्थ्य आपण आपल्या मतदानाने सिद्ध करू शकतो. निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणारा कोणीही असो, सत्ता कोणाचीही असो, संविधानाचे मुख्य तत्त्व कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच, आपल्या देशाच्या लोकशाहीवर अभिमान ठेवून, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मतांत देशाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच म्हणतात, "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" मतदान हा अधिकार केवळ वैयक्तिक स्वातंत्र्यावर आधारित नसून, तो देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा अधिकार जबाबदारीने वापरून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" हे केवळ घोषवाक्य नाही, तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी सत्यता आहे.

आपल्या एका मताने देशाच्या भवितव्याला आकार देता येतो. लोकशाहीची खरी ताकद तिच्या नागरिकांच्या सक्रिय सहभागात आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मतदान करायला हवे. मतदान करणे म्हणजे केवळ आपला हक्क बजावणे नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा वाटा उचलणे आहे.

"आजचा मतदार, उद्याचा देश घडवणारा!"

जय हिंद! जय भारत!


-जिजाऊ शेळके

No comments:

Post a Comment

A Mindful Step Towards Shared Mindfulness

  Closing our eyes and taking a deep breath seems like a very simple activity to do, but it has a deeper connection to the mind and soul tha...