आई-वडिलांच्या सेवेत गुंग असणाऱ्या पुंडलिकाच्या दारी साक्षात परब्रम्ह भेटीस आले होते. परंतु पुंडलिकाने त्यांना सांगून टाकले की, "जोपर्यंत माझ्या आई-वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुला भेटू शकणार नाही. " पुंडलिकाने त्याला एक वीट देऊन साक्षात परब्रह्मास सांगितले की मी येईपर्यंत तू माझी वाट बघ. परंतु या परब्रम्हाचे दर्शन संपूर्ण विश्वाला व्हावे म्हणून पुंडलिक कधी परत आलाच नाही. असा हा पांडुरंग युगे अठ्ठावीस कडेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि जिथे तो उभा आहे त्या गावचे नाव पंढरपूर. आज या पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी असीम भक्त येत असतात. आणि याच पावनभूमीत एक देवखुळा देववेडा भक्त राहून गेला. ज्यांनी असंख्य अभंग रचलीत. ज्यांनी त्यांच्या वाणीतून भागवत धर्माचा प्रसार केला.जे पांडुरंगाच्या पायथ्याशी समाधीस्थ झालेत. असे संत शिरोमणी नामदेव महाराज. दामशेट आणि गोणाई या दांपत्याच्या घरी जन्मलेला हा पुत्र. जनाईच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेला हा लहानगा नामदेव अगदी लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भक्तीत रंगून जायचा. याच्या संपूर्ण मनाने कधी पांडुरंगाकडे धाव घेतली हे कोणाला समजलेच नाही. एकदा लहानगा नामदेव नैवेद्य घेऊन पांडुरंगाकडे गेला माझा नैवेद्य पांडुरंग का खात नाही, तो का जेवत नाही म्हणून तो तिथे रडू लागला. हट्ट करू लागला की हे पांडुरंगा मी आणलेले जेवण तू जेव. त्याचा हा भोळा भाव त्याचा हा भोळा हट्ट पाहून साक्षात पांडुरंग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांनी आणलेले जेवण जेवले. आणि त्यानंतर नामदेवांची आणि पांडुरंगाची मैत्री झाली.
आठव्या वर्षी नामदेवाचे लग्न झालं परंतु नामदेव काही प्रपंचात लक्ष देईनात. दिवस-रात्र ते रावळात राहून पांडुरंगाची सेवा करायचे त्याच्या भक्तीमध्ये गढून जायचे. सुरुवातीला नामदेव फक्त मूर्तीपूजामध्ये विश्वास ठेवायचे त्यांना वाटायचं की मूर्तितच देव आहे. जात वंश धर्मभेद मानणाऱ्या नामदेवांचा अजून ब्रह्मज्ञानी होण्याकडेचा प्रवास सुरु व्हायचा होता. आणि अशातच त्यांची भेट संत ज्ञानेश्वर, सोपाननाथ, निवृत्तीनाथ, मुक्ताई, गोरा कुंभार यांच्याशी झाली. आणि त्यांची भेट झाली आणि नामदेवांना कळले की अजूनही आपण खऱ्या भक्ती मार्गावर नाही आहोत. आत्मज्ञानासाठी, आत्मसुखासाठी, ज्ञानमुद्रेसाठी आपल्याला कोणा एका गुरुची गरज आहे हे लक्षात येतातच. त्यांनी विसोबा खेचर यांच्याकडे धाव घेतली.
परिसाच्या संगे लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण सतसंगे ||
नामदेवांनी त्यांच्या या अभंगातूनच सांगितलेला आहे की , जसे परिसाच्या सानिध्यात लोखंड येते तेव्हा त्या लोखंडाचे सोने होते तसेच आपण एका गुरुच्या सानिध्यात गेलो तर आपणही ज्ञानी होतो. संत नामदेव यांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. आणि अशाच प्रकारे विसोबा खेचर यांच्यामुळे संत नामदेवांच्या जीवनात खूप क्रांती घडली. देव फक्त मूर्तीत नाही तर तो सर्वत्र आहे देव हा माणसात आहे देव हा पशु पक्षांमध्येही आहे. तो चराचरात आहे. हे त्यांना समजले. जात, धर्म, वंश यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत आणि त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या या शिकवणीमुळे आजतागायतही माणुसकीचे नवे धडे गिरवले जात आहेत.
संत नामदेवांनी असंख्य अभंग रचलीत. त्यांच्या या अभंगावाणीतूनच त्यांनी लोकांना माणुसकीचा, भक्तीचा लोककल्याणाचा नवा मार्ग दाखविला. त्यांचे अभंग अतिशय सोपे रसाळ व प्रासादिक आहेत. शुक्र, नारद महादेव, श्रीकृष्ण कुणालाही नामदेवांनी अभंगात वगळलं नाही. पांडुरंगाची आरती कोणाची जर अतिशय प्रसिद्ध असेल तर ती संत नामदेवांची.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिका भेटी परब्रह्म आलें गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ||
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||
एकदा संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेवांकडे तीर्थयात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांच्या या इच्छेचा आदर करत संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनी एकत्र तीर्थयात्रा केली. नाशिक, त्र्यंबक, हरिश्चंद्र पर्वत असं एकेक पहात ते दोघे पश्चिमेकडे वळले द्वारका, प्रयाग इत्यादी तीर्थ त्यांनी पाहिली नरसी मेहता सारख्या गुजराती भाषिक संत मंडळींच्या त्यांच्या भेटी झाल्या. तिथून ते दोघे राजस्थानात वळले सिद्धपूर, अबूतपर्वत, एकलिंगजी अशा ठिकाणी त्यांनी भेटी घेतल्या. संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सानिध्यात बराच काळ एकत्र घालविला.
तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. नंतर सोपाननाथांनीही समाधी घेतली. आणि त्यानंतर एका प्रचंड वादळात होणाऱ्या एका विजेच्या कल्लोळाबरोबर मुक्ताईसुद्धा गुप्त झाली. त्र्यंबकेश्वर मध्ये निवृत्तीनाथांनी समाधी घेतली.
या चारही भावंडांचा आपल्या जीवनात नसण्याच्या दुःखामुळे संत नामदेव अगदी खचून गेले. संत ज्ञानेश्वर यांच्यासोबत घालविलेला काळ संत नामदेवांना सतत आठवू लागला. तो काळ त्यांच्यासाठी अतिशय अवघड काळ होता.
नामदेवांची पंजाब यात्रा कोणास ठाऊक नाही. संत नामदेवांनी पंजाब मध्ये भागवत धर्माचा प्रसार केला. तिथली ती साधी भोळी माणसं त्यांना आवडली त्यांच्यासाठी ते हिंदीत अभंग रचू लागले.
उत्तम नरतनु पाया रे भाई | गाफील क्यों हुआ दीवाने जू||
याचा अर्थ ' अरे , हा उत्तम नरदेह मिळाला आहे त्याचे काही सार्थक करा असे गाफील का झाला आहात ?
असे पंजाब वर हिंडता फिरता नामदेव गुरुदासपूर जिल्ह्यात आले तिथे घुमान नावाचं गाव ते त्या गावी रमले जवळजवळ वीस वर्ष संत नामदेव हे घुमान गावातच राहिलेत. गुरुसाहेब ग्रंथात संत नामदेव यांच्या अनेक अभंगांचा समावेश आहे.
संत नामदेव आपल्या वृद्धापकाळपर्यंत पंजाब मध्ये राहिलेत. त्यानंतर इंद्रियातलं बळ उनावू लागलं आणि मग त्यांना पंढरपुराचे स्मरण झालं. शरीर ठेवायचं ते पांडुरंगाच्या पायापाशी अशी त्यांची इच्छा होती. आणि मग ते परत पंढरपुराला निघून आले. संत नामदेव रावळाच्या ओसरी मध्ये पांडुरंगाच्या चरणी बसले. शरीर त्यागायचं ते पांडुरंगाच्या रावळाच्या पायरीपाशीच. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या संत जनांच्या पायाची धूळ त्यावर उडेल. म्हणून ते ओसरीतून उठले. चालता येत नव्हते तरीही ते पायऱ्यांकडे जात होते. एकेक पायरी उतरत होते शेवटची पायरी आली आणि शरीरातलं बळ हरपल संत नामदेव खचून खाली बसले त्यांनी पायरीवर मस्तक ठेवलं आणि त्यांचे प्राण शरीर सोडून निघून गेल पांडुरंगाच्या भेटीसाठी.
आज त्यांच्या पुण्यतिथी दिवशी भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते.
धन्यवाद
- संस्कृती पाटील
वादसभा सदस्य
Khup sundar lekh👌👌👌 keep it up Sanskruti..
ReplyDelete