Friday, February 27, 2026

हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति, मातीवर चढणे एक नवा थर अंती!

 


रक्ताच्या नात्यांमध्ये ईर्ष्या, अहंकार, अभिमान-दुराभिमान, अट्टाहास, मानापमान, ह्या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या आणि रक्ताचं नातं बाजूला सारून कुरूक्षेत्रावर युध्द लढलं गेलं. द्रौपदीच्या वस्त्रहरणातल्या अनितीपासून ते महाभारताच्या नैतिक युध्दापर्यंत सारं काही त्या युद्धभूमीवर भस्म झालं. मागे उरलेल्या विचारांमधून प्रखरतेने जाणवणारी गोष्ट म्हणजे 'अंतः अस्ति प्रारंभः' अश्या अनेक चांगल्या-वाईट, खऱ्या-खोट्या, नैतिक-अनैतिक गोष्टी पुन्हा-पुन्हा घडत राहणार, पुन्हा-पुन्हा भस्म होत राहणार आणि आपल्याला नव्या नीतिमत्तेची जाणीव करून देत राहणार. ह्या टोकाच्या नैतिकते-अनैतिकतेला जोडणारी एक रेष असते, आणि ह्या रेषेवर आजपर्यंतचं आपलं अस्तित्व असतं.

ज्या विज्ञानाच्या जोरावर ह्या जगाचा कारभार सुरळीत चालू आहे त्याच विज्ञानात शक्यतांना निष्कर्षांपर्यंत आणि प्रयोगांना उपायांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नैतिकता बाजूला ठेवून, तटस्थ आणि अमानुष प्रयोगांच्या निखाऱ्यावर चालावं लागलं. प्राण्यांवर-माणसांवर प्रयोग करणं, हे तेव्हाही अनैतिक होतं आणि आजही अनैतिक आहे; पण ही अनैतिकता त्या प्रयोगांच्या निखाऱ्यावर भस्म झाली आणि त्या राखेच्या थरावर आजचा वैज्ञानिक दृष्टिकोन आधारलेला आहे.

एकेकाळी या समाजाने स्त्रियांच्या मुलभूत हक्कांनादेखील अमान्य केलं होतं. स्त्रीवादाच्या प्रत्येक लाटेने, त्या क्षणापर्यंतच्या पितृसत्तेला मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण ह्या पितृसत्तेचा भस्म होऊन मातीवर निर्माण झालेल्या प्रत्येक नव्या थरावर पुन्हा एकदा अन्यायाची-असमानतारूपी चिता स्त्रिवादाला भस्म करण्यासाठी रचली जात होती.

माणूस कायमच स्वतःला एखाद्या समुदायाशी जोडू पाहतो. त्याची हीच वृत्ती, त्याच्या कर्मांचा, निर्णयांचा, आवडी-निवडींचा पाया असते. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पसारा हा त्याच्यासाठी, समाजासाठी कितीही व्यापक असला; तरीही माणसाच्या मृत्यूनंतर सारं काही अप्रासंगिक ठरतं. त्या व्यक्तीने जन्मभर केलेली नैतिक-अनैतिक कृत्ये, हे सारं त्या चितेवर भस्म होतं. मागे जी राख उरते ती म्हणजे त्या व्यक्तीचा मागे उरलेला विचार. ह्या विचारातून पुढच्या पिढ्यांचे विचार आकार घेऊ लागतात.

अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवट जरी मातीमध्ये होत असला, तरी माती निसर्गनियमानुसार कधीच निरुपयोगी ठरत नसते. त्यातून कायम नवे विचार, नवी सुरूवात, नव्या कल्पनांचे अंकुर फुटतात. कारण त्या मातीत आजपर्यंतचे विचार-अविचार, आजपर्यंतचे अंत आणि आजपर्यंतचं भयाण वास्तव, हे सारं रूजलेलं असतं.

हजारो वर्षांपूर्वी पहिल्या मानवी सभ्यतेच्या खुणा मेसोपोटेमियामध्ये कोरल्या गेल्या. ही सभ्यता अनेक जन्म-मृत्यू, न्याय-अन्याय, प्रगती-अधोगती, समृध्दी-विनाश यांची साक्षीदार ठरली. पण त्या सभ्यतेबरोबर ही सारी स्थित्यंतरेही लयाला गेली. तिच्या अवशेषांवर मातीचे आणि नव्या सभ्यतांचे कैक थर चढत गेले. अस्तित्वात आलेली प्रत्येक गोष्ट कालांतराने भस्म होतं लिखित आहे. पण प्रत्येक आयुष्य भस्म होणार आहे आणि प्रत्येक विचार इतिहासजमा होणार आहे हे माहीत असूनही जगणं आणि विचार करणं थांबत नाही. 'कारण सारं काही निरर्थक आहे' ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचत असताना, 'अर्थपूर्ण'तेची प्रत्येक शक्यता पडताळून पाहणं अनिवार्य असतं. एक काळ असा होता, जेव्हा संशोधन करणं अनैतिक आणि रूढी-परंपरा नैतिक मानल्या जायच्या. आज 'संशोधन' ही सगळ्याची कसोटी मानली जाते आणि प्रत्येक रूढी-परंपरेची नैतिकता तपासून पाहिली जाते.

'नैतिकता आणि अनैतिकता' ह्यासुध्दा मानवी संकल्पना असल्याने त्यांचे नियम व्यक्तीपरत्वे, कालपरत्वे, संस्कृतीनुसार बदलत राहतात. हा बदल जसा अटळ आहे तसंच ह्या बदलणाऱ्या नीति-अनीतिचा शेवट होणेही अटळ आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत मातीवर चढलेल्या प्रत्येक नव्या थरातले नैतिकतेचे-अनैतिकतेचे कण वेचून आपल्याला नितीमत्ता शिकवली जाते, त्याच पध्दतीने वेचलेला प्रत्येक कण समाप्तीच्या अटळतेची जाणीव करून देतो.

नीति-अनीति चितेवर भस्म होते, मातीवर नवा थर चढतो, त्या थरातून पुन्हा नवी नीति-अनीति आकार घेते... थोडक्यात काय तर हे बदल, हे विनाशातून नावीन्याचं आणि नाविन्याच्या विनाशाचं चक्र कालचक्राच्या अधीन होतं, आहे आणि असणार आहे. ह्या बदलांचा काळप्रवाह सांगताना कुसुमाग्रज म्हणतात,

"हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति,

मातीवर चढणे एक नवा थर अंती"


-अनुष्का बिराजदार

3 comments:

हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति, मातीवर चढणे एक नवा थर अंती!

  रक्ताच्या नात्यांमध्ये ईर्ष्या, अहंकार, अभिमान-दुराभिमान, अट्टाहास, मानापमान, ह्या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या आणि रक्ताचं नातं बाजूला सारू...