Tuesday, September 30, 2025

शब्द म्हणजे काय असतं?

 


शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार, इतिहास, साहित्य – या सगळ्याची किल्ली शब्दांतच दडलेली आहे. शब्दांतूनच आपण शिकतो, समजतो आणि जगतो. संतांची वाणी, कवींची कविता, लेखकांचे विचार – हे सारे आपल्या मनापर्यंत पोहोचले ते केवळ शब्दांच्या सामर्थ्यामुळे. शब्द हे मनाचे आरसे आहेत; तेवढेच ते मनाला उभारी देणारे किंवा जखमा करणारेही असतात. म्हणूनच शब्दांचा वापर नेहमी जपून, संयमाने आणि प्रेमाने करावा लागतो.

शब्द म्हणजे काय असतं?

बालपणीचे ते बोबडेपण,
मनामध्ये नात्यांची वीण –
तोच शब्द असतो ना?

शब्द देई ऊब जिवाला,
तोच कधी दूर लोटे मनाला –
तोच शब्द असतो ना?

शब्दामुळे उमलतं प्रेम,
शब्दामुळे साधला जातो नेम –
तोच शब्द असतो ना?

संवादाने वाट खुली होते,
विसंवादाने पोकळी निर्माण होते –
तोच शब्द असतो ना?

गोड शब्द माणसाला घडवतो,
कटू शब्द माणसाला मोडतो –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे ऊब – झाकून घ्यावी किती?
शब्द म्हणजे राग – सहन करावा किती?
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे गालावरून सरकलेले मोरपिस,
शब्द म्हणजे अचानक बसलेली चापट –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे हरणीच्या बेंबीतील कस्तुरी,
सुगंध त्याचा कधीच न संपणारा,
सदैव दरवळत राहणारा… दरवळत राहणारा…

-जुईली पवार

No comments:

Post a Comment

हिंदी साहित्य जगत का एक अविस्मरणीय नाम : श्री हरिवंशराय बच्चन

 जीवन की हर पीड़ा को शब्दों में ढ़ाल देना, और फिर उन्हें गीत बना देना, यही कला थी हरिवंशराय बच्चन जी की। हरिवंशराय बच्चन हिंदी कविता का वह न...