Thursday, May 14, 2020

कविता

घरी बसल्याचे फायदे काय असं विचारता तुम्ही,
सांगा पाहू या आधीची केव्हा पाहिलेलीत चिमणी?
कावळा आणि कबूतर एवढेच पक्षी दिसतात आजकाल पोरांना,
कोरोनाच्या कृपेने आलेत धनेश आणि हळद्या आपल्या भेटीला.
रोगाच्या भीतीपोटी कित्येक व्यवसाय - धंदे पडले बंद,
चैत्र लागताच झालेत शिंपी, खाटीक आणि तांबट घरटे बनवण्यात दंग.
मानव आणि निसर्गातले थांबते जेव्हा घर्षण,
तेव्हा देतो पंचरंगी तांबट पर्णराजीतून दर्शन.

लहानग्या पाखरांची अंडी पळवण्याचा उचललाय भारद्वाजने विडा,
दुभंगलेल्या शेपटीचा कोतवाल त्याला शिकवत असतो धडा.
डौलदार तुऱ्याचा स्वर्गीय नर्तक जरा पहा,
Dj चा गाण्यापेक्षा दयाळाची शिळ ऐका.

वसंताची चाहूल लागताच ' कोकीळ ' ला कंठ फुटतो,
पिवळा धमक सुगरण तिच्यासाठी खोपा विणू लागतो.
इवल्याशा वेड्या राघुच्या पाहा तरी अदा,
संचारबंदी संपल्यावर सुद्धा होऊ आपण निसर्गाला फिदा.
मानवी हव्यासापायी होते यांच्या जगण्याची नाकेबंदी,
जगण्यावर हक्क त्यांचा सुद्धा, करुदे त्यांना मुक्त आभाळात भ्रमंती
                                     - प्राजक्ता मिलिंद पेंडसे
                                       प्रथमवर्ष कला

Saturday, May 9, 2020

विचारांवर विचार करताना



परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण काय करतो? डोक्यात विचारचक्र सुरू होते. हा प्रश्न आपण वाचला होता का? कोणासोबत त्यावर बोललो होतो का? या प्रश्नाचे संदर्भ कशासोबत जुळतात? आपण तो प्रश्न लिहायला घेतो आणि उत्तराला समर्पक असे मनाचेही काही ठोकून देतो. बघता बघता उत्तर पूर्ण होते आणि स्वतःला शाबासकी देत आपण बाहेर पडतो. आता आठवतच नसलेल्या प्रश्नावर मेंदू विचार कसा तयार करतो याचा काही आपण विचार करत नाही.

"विचार करून सांगतो","विचार करावा लागेल", अशी विधानं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो मात्र ही विचारक्षमता कशी विकसित झाली किंबहुना का विकसित झाली यामागे हजारो वर्षांचा रंजक आणि थरारक इतिहास आहे! या इतिहासाचा आढावा घेणारा प्रस्तुत लेख.

मानववंशशास्त्र ही इतिहासाचा अभ्यास करणारी एक शाखा. एका विशिष्ट वेळी काहीतरी जादू घडून मग माणूस विचार करू लागला असं अजिबातच नाही.  आदिम काळी माणसाजवळ भय आणि भूक या दोनच जाणिवा होत्या.मात्र नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे माणसाचा बौद्धिक विकास झाला?विज्ञानाकडे अजूनही या प्रश्नाचे उत्तर नाही!

उत्खननामध्ये सुमारे दीड लाख वर्षांपूर्वीची भित्तिचित्रे, प्रतिके आणि भौमितिक आकृत्या सापडतात.म्हणजे त्यावेळी माणसाला विचार करता येत होता असे गृहीत धरता येईल.आपल्याला काहितरी कळलंय ते इतरांनाही सांगावं असं वाटल्याने त्याने चित्राचा, आकृत्यांचा आधार घेतला असावा.विचारक्षमता उत्क्रांत होण्यात या चित्रांचा महत्वपुर्ण वाटा आहे.
विचारशक्ती विकसित होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भाषा.पण ही भाषा नेमकी कशी तयार झाली यावरूनही कित्येक वर्षांपासून वादविवाद सुरू आहेत. इतिहासतज्ञ युवाल नोआह हारारी लिखित 'सेपीएनस'(Sapiens) हे अफलातून पुस्तक वाचनात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार भाषा विकसित होण्याचे कारण की, प्रत्येक वस्तू आणि विषयाला विशिष्ट पद्धतीने ओळखण्याची मानवी क्षमता. या प्रचंड लवचिकतेमुळे आपण भाषेला आत्मसात करू शकलो. प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे आवाज ही एकमेव ढोबळ क्षमता होती. मात्र मनुष्यप्राण्याकडे असलेल्या मेंदूच्या विकसनशील क्षमतेमुळे माहिती अथवा संदेश अतिशय नेमक्या पध्दतीने सांगता येऊ लागले.
विचार ज्या महत्वपूर्ण घटकामुळे शक्य होतात तो घटक म्हणजे स्मृती किंवा आठवणी.'माणूस कशावर जगतो' या प्रश्नाला 'आठवणींवर जगतो' असे मोघम उत्तर दिले जाते ते अंशतः खरे आहे!एवढंच नाही तर एखादी घटना भूतकाळात ज्या क्रमाने घडली त्याच क्रमाने परत आठवणे आणि त्यानुसार आपल्या हालचाली नियंत्रित करण्यामुळे माणूस शिकार,संरक्षण आणि नियोजनात प्राण्यांपेक्षा उजवा ठरला.

या स्मृती इतकंच महत्वपूर्ण असं काही माणसाच्या ठायी होतं ते म्हणजे नसलेल्या गोष्टींची कल्पना करता येणं ही विलक्षण शक्ती.हरारी म्हणतात त्याप्रमाणे, आपण एखाद्या माकडाला 'तू आत्ता या केळाचा त्याग केला तर तुला स्वर्गात खूप केळं मिळतील' हे कधीच पटवून देऊ शकत नाही.दंतकथा, मिथके सांगणं हे माणसाचे कसब,यामुळे माणूस एका अंमलाखाली आला,त्यांची एकी वाढली.(परीक्षेत मनाने उत्तरे ठोकताना ही कल्पनाशक्ती फार जोरावर असते म्हणतात!)मात्र या क्षमता माणसाला कशा प्राप्त झाल्या त्याहीपेक्षा का प्राप्त झाल्या हा एक न सुटलेला आणि उत्कंठावर्धक प्रश्न आहे.

मग अचानक या विचारावर मी का लिहितोय ते आता स्पष्ट करतो.
माणूस हा अजूनही पूर्णपणे उत्क्रांत झालेला नाही. आपली नवनवीन प्रारूपं(versions)येतच आहेत.आपण बऱ्याचदा म्हणतो की 'आपण लहानपणी किती वेडपट होतो, तांत्रिक आणि तत्सम गोष्टी आपल्या लक्षात यायच्या नाहीत आणि आजकालची लहान मुलं खूपच हुशार असतात.' ही एक बौद्धिक उत्क्रांतीच आहे.कधीकाळी फक्त दगडी हत्यारांवर विसंबून असलेला मनुष्यप्राण्याचे जग आज चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे.मानवी पेशींतील जनुकीय बदल हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे उद्दिष्ट आहे.आज विज्ञानाला उच्चकोटी मानव(superhuman) तयार करणं अशक्य आहे असं नाही.मात्र नैतिक आणि राजकीय कारणं नेहमीच आड येत राहिली. हे सगळं शक्य झाले ते विचारांनी.

माणूस विचार करतो म्हणजे काय करतो?तर ज्ञात असणाऱ्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या माहितीचे तुलनात्मक विश्लेषण करणं म्हणजे विचार.
माणसाचं सबंध जीवनच विचार या गोष्टीने नियंत्रित होतं, मग आपल्याला जर वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर अनेक ठोकताळे बांधता येतील. मानवी मेंदू कसा आणि कुठल्या कालखंडात विकसित झाला हे कळले तर आपण आज उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे समजेल.मानवी उत्क्रांती,मानवी स्वभाव,जनुकीय बदल इतकेच नव्हे तर येऊ घातलेली पिढी,तेव्हाचे पर्यावरण,संस्कृती आणि भविष्य वर्तवणे देखील शक्य होईल.ज्यास आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्ञात असतो त्यास परमेश्वर म्हणतात.मनुष्य त्याच मार्गाने जाऊ पाहतोय. मात्र या सगळ्याचा शेवट काय असेल? मला वाटतं,तो शेवटच आपली वाट पहात असावा!

आदित्य जवळकर ,
तृतीयवर्ष कला (अर्थशास्त्र)

संदर्भ:
 Sapiens- Yuval Noah Harari

उत्क्रांतीचा रहस्यभेद -Mohan Madwanna

Friday, May 1, 2020

वाद

'वाद' ही एक विद्या आहे.
तत्त्वाचे स्वरूप निश्चित करण्याची विद्या म्हणजे वाद होय. वादविद्या कशी निर्माण झाली व तिचे प्रयोजन काय ?
प्रतिप्रश्न हेच वादाचे उत्पत्तीस्थान होय. सिद्धांतावर तर्कशुद्ध प्रतिप्रश्न केला गेल्यानंतर सिद्धांत मांडणाऱ्याने प्रश्नांचे निराकरण करणे व त्यामुळे झालेली चर्चा यातूनच वादाची निर्मिती झाली.
सत्याचा शोध व तत्त्वबोध हेच वादविद्येचे प्रयोजन होय.
अनुकूल आणि प्रतिकूल विचार झाल्याशिवाय सत्याचा बोध होणे शक्य नसते. कित्येकदा असत्य हे सत्याबरोबर बेमालूमपणे मिसळलेले असते. यातील सत्य जाणून घेण्यासाठी प्रतिकूल बाजू समजून घेणे गरजेचे असते. एखादा सिद्धांत बिनबुडाचा आहे की तर्कशुद्ध आहे यासाठी वाद आवश्यक ठरतो. वादामध्ये प्रमाणाधिष्ठीत, तर्कशुद्ध, बुद्धीनिष्ठ चिकित्सा अपेक्षित असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तत्त्वबोधाच्या इच्छेने होणारी चर्चा म्हणजेच वाद होय.

सर्व विद्यांची तपासणी वादाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे वादाचे अनन्यसाधारण महत्व आजही टिकून आहे. त्याचबरोबर वादविवाद करण्यासाठी समग्र ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये वादातूनच सत्य आणि तत्वांचा बोध होत असतो म्हणून वादविद्या ही बौद्धिक संस्कृतीच्या विकासाचे लक्षण आहे.

आपण रोजच्या जीवनात काही वाद चालू असेल तर त्याला पटकन निरर्थक ठरवून मोकळे होतो पण प्रत्यक्षात जो निरर्थक असतो तो वाद असूच शकत नाही. कोणत्याही चर्चेला अथवा भांडणाला 'वाद' तेव्हाच म्हणता येऊ शकते जेव्हा त्यातून सत्य आणि तत्त्वाचा बोध होतो. त्यामुळे कोणतीही चर्चा अथवा भांडण संपल्यानंतरच याचा निर्णय करता येतो की झालेली चर्चा हा वाद होता अथवा नाही.

'वादे वादे जायते तत्त्वबोधः ।' हे वादसभेचे ब्रीदवाक्य आहे त्याच्या स्पष्टीकरणातून वाद स्पष्ट होतो. वादे हा शब्द दोन वेळा वापरण्याचे कारण नित्यता दर्शविणे. सातत्याने विविध विषयांवर नियमित वाद केल्याने तत्त्वबोध व सत्याची प्राप्ती होते.
                                           
- आमोद माधव केळकर, TYBA

वादाच्या निमित्ताने



    तो शहराच्या बाजारपेठेत उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रश्न विचारून वाद घालत असे. एखाद्या विषयावर वाद घालायचा असेल तर सगळ्यात पहिले त्या विषयाची व्याख्या करूया असं तो म्हणायचा. लोकांनी एक व्याख्या केली तर तो त्यावर प्रतिप्रश्न करून ती व्याख्या खोडून टाकायचा. असं झाल्यावर आपल्या आधीच्या व्याख्येत सुधारणा करून समोरचा पुन्हा नवी व्याख्या करत असे. तो  पुन्हा नव्या व्याख्येत खोट काढत असे. अशा पद्धतीने तो प्रश्न विचारून समोरच्या माणसाच्या बोलण्यातला फोलपणा दाखवत असे. तो स्वतःचं खरं करत नव्हता, सिद्धांत मांडत नव्हता. फक्त प्रश्न विचारत होता. शेवटी लोक त्याला कंटाळत असत. पण मला ज्ञान मिळवून द्यायला माझी मदत कर अशी विनंती तो करत असे. "मला काहीही माहीत नाही, हे मी मान्य केलंय, म्हणून मी ज्ञानी आहे", अस म्हणणारा तो,  तत्वज्ञानी, विचारवंत सॉक्रेटिस होता.त्याच्या या पद्धतीला  Midwifery method, म्हणजे प्रसुतिविद्या (प्रसूतीच्या वेळी सुईण ज्याप्रमाणे शरीरातून बाळ बाहेर काढायला मदत करते), त्याप्रमाणे  समोरच्याच्या मनातून संकल्पना बाहेर
काढायला मदत करणारी त्याची ही पद्धत, Midwifery Method म्हणजे सुईणी ची पद्धत किंवा Socratic debate म्हणून पुढे आली. समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचे केवळ खंडन करणे, स्वतःचे खरे करणे, हे वादात येत नाही. वादात मुद्यांना पुन्हा  प्रन्हा प्रश्न करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न असतो.

पुराणकथेमध्ये रुपसुंदरी रंभा आणि ऋषी शिरोमणी शुक यांच्या संवादामध्ये एक श्लोक येतो, "वादे वादे जायते तत्वबोध:" अर्थात वादामधूनच ज्ञानवर्धन आणि बोध घडून येतो. एखाद्या विषयाचे अंतिम तत्व कळवून घेण्यासाठी मुद्दे मांडून जी चर्चा केली जाते, त्याला वाद म्हणतात. ही चर्चा जिथे घडवून आणली जाते, त्या ठिकाणास वादसभा असे म्हणतात. असे वाद-विवाद, विवेकापर्यंत पोहचायला मदत करतात. परंतु वाद हे केवळ भौतिक पातळीवरती अस्तिवात नसतात. या पलिकडे वैयक्तिक पातळीवर देखील आपला स्वतःशी वाद-विवाद होतच असतो. आणि म्हणून संतवाणी सुद्धा सांगते, "तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी!" स्वतःशी वाद घालून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न आपण करतच असतो. नेहमी निष्कर्ष निघतोच असे नाही. पण म्हणून आपण विचार करणे, तो मांडणे थांबवत नाही.

थोडक्यात माणसाचे विचाराशी अतूट असे नाते आहे. याच नात्याला व्यासपीठ देणारी, स.प.महाविद्यालयात रुजू असणारी, अनेक वर्षांची परंपरा असणारी वादसभा ही विद्यार्थी संघटना वक्तृत्व, वादविवाद, निबंध, कविता, इ. अनेक कौशल्यांवर काम करते. ही कौशल्य केवळ कौशल्य नाहीत तर त्या कला आहेत, हे जाणते. या कला जोपासल्या आणि वाढवल्या गेल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहते. एखादी कृती करावी की करू नये या संभ्रमात आपण नेहमीच असतो. हाच संभ्रम काढून टाकण्यास स्वच्छ आणि निर्मळ विचारांची देवाणघेवाण होणं आवश्यक असते. या देवाणघेवाणीत, आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी वादसभा विविध विषयांवर विचारमंथन करून या कौशल्यांना आणि कलांना जोपासण्याच्या हेतूने, त्याचे डिजिटल लिखित स्वरूप (Blog) प्रसिद्ध करण्यास सुरुवात करत आहे.

महाविद्यालयात विद्यार्थी असणारे वादसभेचे आजी, माजी सदस्य या डिजिटल माध्यमातून त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतील. वेगवेगळ्या विषयांवरील स्वलिखित कविता, लेख, निबंध, जिंकलेल्या स्पर्धांची लिखित स्वरूपात भाषणे, इ. चा यात समावेश असेल. Blogs मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत असतील. ज्या विद्यार्थ्याने Blog वरती विचार प्रकट केले असतील, तो विद्यार्थी स्वतः त्या विचार मांडणीसाठी जबाबदार असेल.

ज्येष्ठ लेखक नरहर कुरुंदकर, म्हणतात त्याप्रमाणे "मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे".  न पटणाऱ्या मतांबद्दलही आम्हाला आदर आहे. आणि म्हणूनच हा लिहिण्याचा उपक्रम मतमतांतरे आणि चर्चेशिवाय अपूर्ण आहे.  चांगला वक्ता, चांगला लेखक, चांगला स्पर्धक तयार करण्याचा वादसभेचा प्रयत्न कायम असतो. पण या डिजिटल माध्यमातून चांगला वाचक निर्माण करण्याचा आणि वादसभेच्या सदस्यांपलिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहजतेने पोहचण्याचा आमचा प्रयत्न असेल.



शरयू जोरकर, SYBA
(विशेष आभार - रेणुका कल्पना, माजी वादसभा सचिव )

Are We Still Stuck in the Past? Ancient Ideals and the Modern Man

It is estimated that Homo sapiens (today’s humans) emerged around 300,000 years ago in Africa. Homo sapiens was the most intelligent race am...