Friday, March 7, 2025

जागतिक महिला दिन!


हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही चालू असलेल्या संघर्षाची! या उत्सवाची सुरुवात रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. ८ मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. १९०८ मध्ये १५०० महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता. रशियातील महिलांनी ‘महिला दिवस’ साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. तर युरोपमध्येही महिलांनी ८ मार्च रोजी शांतीच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.

महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात, मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. २०२५ सालच्या जागतिक महिला दिनाची संकल्पना आहे – ‘सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी : हक्क, समानता, सक्षमीकरण.’

परंतु ही केवळ घोषणा नसून स्त्रीत्वाने संपूर्ण जगाला घातलेली साद आहे—एक परिवर्तनाची मागणी. स्त्री शक्तीच्या सन्मानासोबत त्या शक्तीच्या न्यायाची हाक. इतिहासाच्या कपाटात अनेक कथा दडल्या आहेत. काही स्त्रियांनी क्रांती घडवली, काहींनी विद्रोह केला, तर काहींनी सहनशीलतेच्या कडेलोटावरही आत्मसन्मान जपला. ऋग्वेदातील गार्गी, मैत्रेयी, राणी लक्ष्मीबाई, रोजा पार्क्स, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, मारिया क्युरी—अशा अनेक स्त्रिया जागतिक, राष्ट्रीय, शहरी, ग्रामीण स्तरावर आदर्श ठरल्या.

पण ८ मार्च हा दिवस फक्त या महान स्त्रियांना स्मरण्याचा आहे का? की नवीन उदाहरण घडवण्याची प्रेरणा घेण्याचा?

मला वाटते—दोन्हीही नाही.

या ओळखींच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिचे स्त्रीत्व मुक्तपणे जगता यावे, हाच या दिवसाचा खरा अर्थ. नेहमीप्रमाणे यावर्षीही ८ मार्च हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल, पण या आनंदाच्या पलिकडेही एक कटू वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अन्याय सहन करत आहेत, आत्मसन्मानाच्या आणि स्वातंत्र्याच्या एका खोल दीर्घ श्वासाची याचना करत आहेत. हे चित्र बदलायला किती काळ लागेल, हे काळच ठरवेल.

परंतु मला ठाऊक आहे की, काही पुरुषी क्रौर्याच्या पलीकडेही एक पुरुषी करुणेचा उजेड आहे. त्या पुरुषी ममत्त्वासाठी माझा हा लेख. स्त्रीत्वाच्या जाणिवेच्या शब्दांत अरुणा ढेरे म्हणतात—

"की हिला मातीचं बळ मिळो,

लहरी वादळाचं पिसाटपण

समजून रानावनात तगण्यासाठी...

की हिला पाखरांच्या संवादाचं सुख कळो...

वाढण्याच्या कळा सोसत पानांत येण्यासाठी...

ही होईल जर स्वतःच्या ओळखीइतकी खोल,

तर टिकवील आपोआपच स्वप्नांच्या शिरेशिरेतली ओल....”

एकीकडे मातीचं बळ आणि वादळाचं पिसाटपण अंगी रुजवणाऱ्या स्त्रीला, पाखरांच्या संवादाचं सुख कळण्याइतकी शांतीही मिळो. तिच्या स्वप्नाइतकीच तिला तिची खरी ओळखही कळो.

उत्सव होवो तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कसोटीचाही—

ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचाही,

आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.


-प्रतीक्षा ओंबळे

Thursday, February 27, 2025

भारतीया वैज्ञानिकाः।

          लीलावती भास्कराचार्यं पृच्छति, यदि कमपि वस्तु वयम् उत्क्षिपामः, तर्हि तद् वस्तु पुनः अधः पतति। एतस्याः क्रियायाः कारणं पृथ्व्याः आकृष्टिशक्तिः अस्ति। पृथ्वी शेषनागे, कूर्मे, तथा च मेरुपर्वते अवलम्बिता नास्ति, एतदपि भवानेव अवदत्। तर्हि गुरुत्वम् इति कारणात् पृथ्व्याः तथा च अन्यानां खगोलपिण्डानाम् अधःपतनं किमर्थं न भवेत्? भास्कराचार्यः ताम् उत्तरं ददति, 

          आकृष्टिशक्तिश्च मही तया यत्, खस्तं गुरुः स्वाभिमुखं स्वशक्त्या ।

          आकृष्यते तत्पततीव भाति, समेसमन्तात् क्व पतत्वियं खे ।।

वयं वदामः, न्यूटनमहोदयेन गुरुत्वाकर्षणसिद्धान्तः कथितः। परन्तु तस्य शून्यपञ्चपञ्चशतकात् पूर्वं सम्पूर्णब्रह्माण्डस्य गुरुत्वाकर्षणविषये भास्कराचार्यमहोदयः उक्तवान्।ये मनुष्याः प्राचीनकाले फलानि खादित्वा, एतद् फलं मधुरम् उत्तमं च अस्ति, परन्तु तद् फलं विषयुक्तं अस्ति, एतद् ज्ञातवन्तः, ते अपि वैज्ञानिकाः आसन्, एतद् वक्तुं शक्नुमः। कोऽपि विषयुक्तं फलं खादित्वा मृत्युम् अपि प्राप्तवान्, कोऽपि अश्मान् घर्षयित्वा अग्निम् अपि निर्मितवान्। एताः सर्वे वैज्ञानिकाः एव आसन्। तत् कारणात्, ये ये कानपि वैज्ञानिकप्रयोगां कृत्वा तस्मात् किमपि  नूतनं ज्ञानं प्राप्नुवन्तः, ते ते वैज्ञानिकाः एव सन्ति, एतद् अहम् मन्ये।

विज्ञानं नाम विशेष-ज्ञानम्। अतः यैः यैः किञ्चिदपि विशेषं ज्ञानं प्राप्तं, ते ते सर्वे वैज्ञानिकाः एव सन्ति, इति अहं मन्ये। तस्मात्, येन पाणिनिमहोदयेन, संस्कृतम् इति समृद्धायाः भाषायाः सूक्ष्मनिरीक्षणेन, प्रत्येक-शब्दस्य कृते चिन्तनं कृत्वा विस्तृतं व्याकरणं लिखितं, सः पाणिनिमहोदयः अपि वैज्ञानिकः अस्ति, इति अहं मन्ये। अद्य सङ्गणकशास्त्रस्य यत्समानम् कठिनतमं व्याकरणमावश्यकं, तत्समानम् व्याकरणं सः कैककालात् पूर्वम् एव रचितवान्। न केवलं पूर्वकाले, अपि तु अद्यसमये अपि विज्ञाने एव संपूर्णाः मग्नाः वैज्ञानिकाः सन्ति। यदि वयं पश्यामः, पोखरण इत्यत्र भारतस्य परमाणुस्फोटप्रदर्शनं जातम्। तत्र काकोडकर अनिलमहोदयस्य बहु महत्वपूर्णम् उत्तरदायित्वम् आसीत्। परन्तु यत्र एव सः तस्य तातस्य मृत्युवार्तां प्राप्तवान्। सः सत्वरं गृहं गत्वा, तातस्य अन्तिमदर्शनं गृहीत्वा, पुनः सत्वरं पोखरण इत्यत्र आगतवान्। कौटुम्बिक उत्तरदायित्वाद् अपि देशकार्यं परम् अस्ति, इति तस्य निष्ठा। देशस्य कृते यद् उत्तरदायित्वम् अस्ति, तस्य प्रथमतः विचारः करणीयः, इति महती भावना तस्य हृदये अस्ति।

माशेलकरमहोदयेन भारतस्य पुरातनग्रन्थां पठित्वा, तत्र ये ये सिद्धान्ताः दत्ताः सन्ति, तेषां सर्वेषां 'पेटण्ट' इत्युक्ते स्वाम्यं तेन भारतस्य कृते प्राप्तम्। हल्दी तथा बासुमती तण्डुलस्य स्वाम्ये अमेरिका देशः प्राप्तुम् इच्छितवान्। परन्तु महा-प्रयासेन माशेलकरमहोदयेन ते स्वाम्ये भारतस्य कृते प्राप्ते। अहम् एकं साक्षात्कारम् अपश्यम्। तत्र साक्षात्कारकर्तारः वैज्ञानिकाय पृष्टवान्, यत् "वैज्ञानिकक्षेत्रे भारतस्य किं योगदानम् अस्ति?" सः वैज्ञानिकः अकथयत्, "विज्ञानक्षेत्रे भारतस्य योगदानं शून्यम् अस्ति।" यदि वयं एतस्य उत्तरस्य विषये चिन्तयामः, तर्हि एकः निष्कर्षः जातः, यत् "शून्यः" एषः सर्वेषां वैज्ञानिकसिद्धन्तानां मूलम् अस्ति। अतः सर्वसिद्धन्तानां मूलम् एव अस्माकं भारतदेशेन विज्ञानक्षेत्राय दत्तम् अस्ति। तस्मात्, अद्य ये ये देशाः अवकाशे उड्डयनं कुर्वन्ति, ते ते सर्वे भारतस्य आर्यभट्टः नाम वैज्ञानिकस्य ऋण्यः सन्ति। 

शून्येन विना काचिद् अपि सङ्ख्यायाः मूल्यं न वर्धते। तत् समानं, वैज्ञानिकैः विना वैज्ञानिकक्षेत्रस्य वर्धनम् अपि न भविष्यति, एतद् वयं सदैव संस्मराम इति अहं मन्ये।


- मुक्ताई देसाई

Thursday, February 13, 2025

स्नेहेन सर्वे वशाः।

मध्यायुगीनकाले मुघलः तथा हिन्दुराष्ट्राणाम्मध्ये  किञ्चिदपि स्नेहसम्बन्धाः नासन् । आक्रमणं युद्धं च एतासां सर्वासां परिस्थितौ  सामान्यजनानां जीवनम् अत्यधिकं कठिनं जातम्। कर्णावती सङ्ग्रामस्य मृत्योः पश्चात् राज्यपदे नियुक्ता। स्वराज्यं सङ्कटे दृष्ट्वा सहाय्यस्य अपेक्षया सा हुमायवे रक्षासूत्रं प्रेषितवती। अतः अन्ते रक्षासूत्रस्य कारणात् हुमायुः तस्यै सहाय्यं कृतवान्। द्वाभ्यां मुघलसम्राटाभ्यां सह युद्धं जातम्। तत्कारणात् हिन्दु -  मुघलसम्बन्धः दृढः जातः। अतः 'स्नेहेन सर्वे वशाः' एतदेव सत्यम्। ' स्नेह ' शब्दः नाम न केवलं प्रेम , आकर्षणम् अपि तु आत्मीयता, संवेदनशीलता तथा च बन्धुभावः। अग्रे ' सर्वे वशाः ' अत्र सूचितस्य सम्बन्धस्य अर्थः न केवलम् आकर्षणम् अपि तु उन्मुखता, वात्सल्यम्, आत्मीयतायाः सम्बन्धाः। सिन्धूताई- सपकाल-महोदया एव तस्य  समर्पकम् उदाहरणम् । रक्षणार्थं नैके बालकाः आक्रन्दन्ति, ते शिक्षणात् वञ्चिताः आसन्। एतेषां कृते सा मातृसमम् उत्तरदायित्वं निर्वहति। तान् आकाशे विहारार्थं प्रेरिता । तेषां बालकानां वशीकरणम् अपि सा स्नेहेन कृतवती। 

यस्याः कारणेन समाजस्य निम्नघटकाः आकाशे उड्डयनं कर्तुं शक्नुवन्ति तथा च साने गुरुजी नाम्ना ख्यातः महोदयः उक्तवान्,  स:एक एव सत्यधर्मः, विश्वाय स्नेहाभावः अर्पणीयः। तत्समानं व्यक्तिमत्वम् अस्ति आमटे - प्रकाशमहोदयस्य । समाजात् बहिष्कृतानाम् आदिवासिबान्धवानां कृते सः दीपस्तम्भः अभवत्। आदिवासिबान्धवानां कृते तस्य कार्यं अतुलनीयम्। तेषां कृते सः करनिर्मुक्तं शिक्षणम्, आरोग्यसुविधाः , व्यापारज्ञानम्, कृषिकार्यं, व्यवहारज्ञानं च स्नेहेन एव आरभत्। आदिवासी प्रभागतः आगता द्रौपदी मुर्मू यदा राष्ट्रपतिपदे नियुक्ता भवति, तदा आमटे -महोदयस्य कार्यपूर्तिः अभवत्, इति अहं मन्ये। तत् कारणात् भारतीयाः तथा आदिवासिबान्धवाः च वशाः।

यदा वयं ' सर्वे ' इति वदामः, तदा तस्य अर्थः मनुष्याः इति एव नास्ति, अपि तु पशवः, प्रकृतिः अपि अस्ति। एतान् सर्वान् अपि स्नेहेन वशीकर्तुं शक्यते। पशवः स्पन्दनं, स्पर्शं च अनुभवितुं समर्थाः। स्नेहपूर्णवर्तनस्य कारणात् ते अपि एकानिष्ठाः अभवन्। तेषां भूतदयां दर्शयित्वा ,  पालनपोषणेन आमटे महोदयः तान् आप्तान् कृतवान्। न केवलं आमटे महोदयः अपि तु महाडतः मेस्त्री  प्रेमसागर- महोदयः। तेषां गरुडसंवर्धनस्य कार्येण न केवलं गरुडान् अपि तु पयर्यावरणस्नेहिनः सः वशं कृतवान् ।

कम् अपि भारतीयं पश्यतु। सः ' वसुधैव कुटुम्बकम् ' इति धारणां मन्यते।  अतो भारतः रशियातः तैलं स्वीकरोति। चीनदेशः, यः रशियादेशस्य शत्रुपक्षः। तेन सह सामञ्जस्य विधेयकं करोति सःभारतः । रशिया - यूक्रेन युद्धे मध्यस्थः भवति। एतद् कारणात् भारतेन सम्पूर्णविश्वं वशीकृत्य सः शान्तिदूतस्य भूमिकां निर्वहति। अतः अहं मन्ये, स्नेहेन सर्वे वशाः। परन्तु  अहं विषयस्य द्वितीयं पक्षम् अपि वक्तुम् इच्छामि। यदि 'स्नेहेन सर्वे वशाः ' इति शक्यं तर्हि कुरुक्षेत्रे युद्धं न जातम् स्यात्। रावणवधस्य कर्तव्यम् एव पुरा न भूतं , कस्या अपि स्त्रीणां शोषणं न जातं स्यात्। न्यायालयं गत्वा  न्यायभिक्षायाः आवश्यकता न समुद्भूता। कौटिल्यः अपि उक्तवान् 'शत्रोः मित्रम्, शत्रुः एव ज्ञातव्यम्, तस्य नाशः करणीयः' । अतः एव अपि सत्यं स्नेहेन सर्वे वशाः?

          यथा संस्कृतसुभाषिते उक्तम् , 

बन्धनानि किल सन्ति बहूनि प्रेमरज्जुमयबन्धनमाहुः । दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रिः निष्क्रियो भवति पङ्कजकोशे ।।

एतस्य सुभाषितस्याधारेण चिन्त्यते, तर्हि  'स्नेहेन सर्वे वाशाः ' एतद् सत्यमेव।


-तन्वी चितळे

Saturday, February 8, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Thursday, January 2, 2025

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.

माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:

ज्ञान नाही, विद्या नाही  

ते घेण्याची गोडी नाही  

बुद्धी असूनही चालत नाही  

त्यास मानव म्हणावे का?

या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?

तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:

सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे  

दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे


ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!


- श्रुती शिंदे

जागतिक महिला दिन!

हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही ...